Agneepath Scheme : अग्निवीरांसाठी वयोमर्यादा वाढवली, किती वर्षांची सूट देण्यात आली, जाणून घ्या…

Agneepath Scheme News : बारावीचं प्रमाणपत्र दिलं जाईल. याशिवाय त्यांना नोकरी करायची असेल तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या पोलीस दलात सूट मिळणार आहे.

Agneepath Scheme : अग्निवीरांसाठी वयोमर्यादा वाढवली, किती वर्षांची सूट देण्यात आली, जाणून घ्या...
अग्निवीर भरतीसाठी जुलैपासून नोंदणीला सुरुवात
Image Credit source: social
| Updated on: Jun 17, 2022 | 8:18 AM

मुंबई : केंद्र सरकारच्या (Central Government) संरक्षण विभागानं रात्री उशिरा एक मोठा निर्णय घेतला आहे. लष्करातील चार वर्षांच्या अल्पकालीन सेवेच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या (Agneepath Scheme) विरोधात काल देशाच्या अनेक भागांत प्रचंड निदर्शनं करण्यात आली होती. यावेळी तरुणांनी वयोमर्यादा (Age Limit) वाढवण्याची मागणी केली होती. तर या योजनेतील पेन्शन संपुष्टात आणण्याला देखील तरुणांनी विरोध केला. यावेळी अनेकांनी घोषणाबाजी देखील केली. हे निदर्शनं आणि तरुणांची मागणी बघताच संरक्षण मंत्रालयानं मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निर्णयानुसार यावर्षी भरती प्रक्रियेत दोन वर्षांची एकवेळ सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आता यावर्षी उमेदवारांना वयाच्या 23 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे सैन्यात भरती झाली. 2022 च्या प्रस्तावित भरतीमध्ये दोन वर्षांची एक वेळची सूट देण्याचा निर्णय घेतल्यानं अधिकाधिक तरुणांना देशसेवेची संधी मिळेल.

दोन वर्षांची सूट देण्याचा निर्णय

2 वर्षांपर्यंत सूट

अशा प्रकारे 23 वर्षांपर्यंतचे तरुण अग्निपथ भरती प्रक्रिया 2022 साठी अर्ज करू शकतात. अग्निपथ योजनेंतर्गत केवळ 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करण्यास पात्र असले तरी, यावर्षी 23 वर्षांपर्यंतचे तरुण यासाठी अर्ज करू शकतात. त्यांना दोन वर्षांची एकवेळ सूट देण्यात आली आहे. अग्निपथ योजनेच्या आरंभ प्रक्रियेदरम्यान सशस्त्र दलात सर्व नवीन भरतीसाठी प्रवेशाचे वय 17 ते 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र यावर्षी 23 वर्षांपर्यंतच्या तरुणांना दोन वर्षांच्या एका वेळेच्या सवलतीसह फॉर्म भरता येणार आहे.

46 हजार सैनिकांची भरती

या नव्या योजनेविषयी बोलायचं झाल्यास लक्षात घेण्यासारखं आहे की सरकारनं आता सैन्यात भरतीसाठी चार वर्षांसाठी अल्पकालीन नोकऱ्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअंतर्गत यावर्षी 46 हजार सैनिकांची भरती होणार आहे. या चार वर्षांच्या कालावधीत 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 4 वर्षांनंतर, काही भरती झालेल्यांना सैन्यात कायमस्वरूपी पद मिळेल, तर बहुतेकांची सैन्यातील सेवा संपुष्टात येईल. ज्यांची सेवा संपुष्टात येईल, त्यांना अनेक प्रकारच्या संधींमध्ये सवलत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.

बारावीचं प्रमाणपत्र, बँक कर्ज देखील

तरुणांनी चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर त्यांना पुढील शिक्षण घ्यायचं असल्यास त्यांना बारावीचं प्रमाणपत्र दिलं जाईल. याशिवाय त्यांना नोकरी करायची असेल तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या पोलीस दलात सूट मिळणार आहे. याशिवाय त्यांना स्वयंरोजगार करायचा असेल तर बँक त्यांना कमी व्याजदरानं कर्जही देईल.