आयआयटी मुंबईत बीटेकच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन, कारण अद्याप अनभिज्ञ

| Updated on: Feb 13, 2023 | 6:53 PM

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने तीन महिन्यांपूर्वीच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षा शनिवारीच संपल्या. या परीक्षांमध्ये तो सहभागी झाला होता.

आयआयटी मुंबईत बीटेकच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन, कारण अद्याप अनभिज्ञ
आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याने जीवन संपवले
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : आयआयटी मुंबईच्या पवईतील वसतिगृहात एका विद्यार्थ्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. मृत विद्यार्थ्याकडून किंवा वसतिगृहातील त्याच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे याच वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने हा अपघात नसून आत्महत्या असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने स्वतः मयत विद्यार्थ्याला सुरक्षा भिंतीवर चढताना पाहिल्याचे पोलिसांना सांगितले.

उडी घेतल्यानंतर विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याने विद्यार्थ्याला सुरक्षा भिंतीवर चढताना पाहिले आणि खाली उतरण्यासाठी आवाजही दिला. परंतु त्याने ऐकले नाही आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याने भिंतीच्या दुसऱ्या बाजूला उडी मारली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

अहमदाबादमधील रहिवासी आहे विद्यार्थी

विद्यार्थ्याचा आरडाओरडा ऐकून तेव्हा इतर विद्यार्थी धावत आले आणि त्याला उचलून रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत विद्यार्थी गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी आहे. त्याने नुकतेच केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेकसाठी प्रवेश घेतला होता.

हे सुद्धा वाचा

तीन महिन्यांपूर्वीच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने तीन महिन्यांपूर्वीच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षा शनिवारीच संपल्या. या परीक्षांमध्ये तो सहभागी झाला होता. परीक्षेत या विद्यार्थ्याला पेपर अवघड गेल्याने त्याने रविवारी दुपारी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरु

पोलिसांनी याप्रकरणी सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यासोबतच त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आल्याचे सांगितले. सध्या पोलिसांनी या घटनेची अपघाती नोंद केली आहे.

शवविच्छेदन अहवालात डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलीस या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.