लग्नाळू मुलांना लग्नासाठी मुलगी पाहून द्यायचे, मग लग्न होताच नवरीसह दागिने घेऊन पसार व्हायचे, अखेर…

| Updated on: Jun 07, 2023 | 10:05 AM

लग्नासाठी मुली मिळत नसल्याने आता लग्नाळू मुलांचे पालक लग्न जमवण्यासाठी एजंटकडे जात आहेत. याचाच गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत आहेत.

लग्नाळू मुलांना लग्नासाठी मुलगी पाहून द्यायचे, मग लग्न होताच नवरीसह दागिने घेऊन पसार व्हायचे, अखेर...
लग्नाळू तरुणांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : हल्ली लग्नासाठी मुली मिळत नसल्याने लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. पुण्यातील जुन्नरमध्ये अशीच एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. शेतकरी लग्नाळू मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने एका एजंटमार्फत एका शेतकरी तरुणाची फसवणूक करण्यात आली होती. लग्नानंतर नवरी माहेरी गेली ती परतलीच नाही. त्यानंतर तिने दुसऱ्या तरुणाला जाळ्यात ओढत त्याच्याशी लग्नाचे नाटक केल्याचे उघड झाले. अखेर ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. नारायणगाव पोलिसांनी नवरी मुलीसह फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. या टोळीने यापूर्वी दोन लग्नाळू मुलांची फसवणुक केल्याचे उघड झालं आहे. लग्न करून दागिने घेवून पळून जायचे. त्यामुळे लग्नाळूंना अशा बनावट लग्न स्थळांपासून सावध रहाण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे वास्तव पहायला मिळतंय. यामुळे तरुण एजंटमार्फत लग्नासाठी मुली पाहतात. याचाच फायदा घेत बनावट लग्न करणारी टोळी सक्रिय झाली आहे. अपुरी शेती, नोकरी व्यवसायाची पुरेशी साधनं नसल्याने तरुणांमध्ये बेरोजगारीही वाढली आहे. लग्नाळू मुलं रखडलीय याचाच फायदा घेत ही टोळी त्यांना गंडा घालायची.

जुन्नरमधील शेतकरी लग्नाळू तरुणाची दोन लाखांची फसवणूक

जुन्नर तालुक्यातील एका 32 वर्षीय शेतकरी तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला होता. याप्रकरणी तरुणाने या रॅकेटमध्ये सहभागी संबंधित एजंट आणि तरुणीसह एका महिलेबाबत पोलिसात लेखी तक्रार दाखल केली होती. सदर तरुणाला एका ओळखीच्या व्यक्तीने पैसे दिल्यास लग्नासाठी मुलगी पाहुण देतो असे सांगितले. मग त्या व्यक्तीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या एका एजंटशी संबंधित तरुणाचा संपर्क करून दिला. त्या एजंटने तरुणाला नाशिक जिल्ह्यातील एका गावातील मुलगी दाखवली. मग दोघांचे लग्नही झाले. लग्न जमवण्यासाठी एजंटने तरुणाकडून दोन लाख रुपये घेतले.

हे सुद्धा वाचा

लग्नानंतरचे सर्व रीतीरिवाज पार पडल्यानंतर नवरी माहेरी गेली ती पुन्हा सासरी आली नाही. तरुणाने पत्नीला फोन करून कधी येते, असे विचारले असता मुलीने मला नांदायचे नाही सांगितले. त्यानंतर तरुणाने एजंटला प्रत्यक्ष भेटून घडलेली हकीकत सांगितली. यावेळी एजंटने संबंधित तरुणी आणि तिची साथीदार महिला माझा फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.