आईचा मोबाईल चार्जिंगला लावला अन् घरातून बाहेर पडला, आईला वाटले खेळायला गेला, पण…

| Updated on: May 16, 2023 | 8:03 PM

ते चौघेही सारख्याच वयाचे होते. एकमेकांचे चांगले मित्र होते. खेळण्या-बागडण्याचे त्यांचे वय होते. पण या वयात त्यांनी जे केले त्याची कुणीच कल्पना करु शकत नाही.

आईचा मोबाईल चार्जिंगला लावला अन् घरातून बाहेर पडला, आईला वाटले खेळायला गेला, पण...
शेतीच्या वादातून शेजाऱ्याने जावयाला संपवले
Follow us on

सिवनी : कुणी कल्पनाही करु शकत नाही अशी एक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील तीन मुलांनी केले ते पाहून पोलिसांसह सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी आपल्या 12 वर्षाच्या मित्राची हत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. तिघांनी अगदी पद्धतशीरपणे हत्येचा कट रचून हे हत्याकांड केले. एवढेच नाही हत्या केल्यानंतर सर्व पुरावेही नष्ट केले. ज्या वयात आयुष्य म्हणजे काय हेच समजत नाही त्या वयात त्यांनी आपल्याच मित्राचं आयुष्य संपवलं. गुन्हा करणारी तिन्ही मुलं 11, 14 आणि 16 वर्षे वयाची आहेत.

मुख्य आरोपीचे बहिणीशी बोलणे पीडिताला खटकत होते

पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींपैकी एक जण पीडित मुलाच्या बहिणीशी बोलायचा. पीडित मुलाला हे आवडत नव्हते. यामुळे पीडित मुलाने आरोपीला समज दिली होती. यावरून पीडित आणि आरोपीमध्ये भांडण झाले. यातूनच आरोपीने आपल्या दोन मित्रांसह पीडित मुलाच्या हत्येचा प्लान केला. त्यानुसार आरोपीने पीडित मुलाला आमिष दाखवून घरी बोलावले आणि नंतर सायकलच्या साखळीने गळा आवळून त्याच्या शरीरावर वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरुन फेकून देण्याचा प्रयत्न केला.

मुलांनी ज्या पद्धतीने हा गुन्हा केला आहे ते पाहता, टीव्ही किंवा मोबाईलवर गुन्ह्याशी संबंधित मालिका पाहिल्यानंतर आरोपींना याची कल्पना आली असावी, असा अंदाज एसपी रामजी श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे. मयत मुलाच्या शरीरावर चाकूने हल्ला केल्याच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

आईचा फोन चार्जिंगला लावला अन् घरुन गेला

मुलाच्या आईने त्याला आपला मोबाईल चार्जिंगला लावण्यास सांगितले होते. त्याने आईचा फोन चार्जिंगला लावला आणि रविवारी दुपारी 1 वाजता घरातून निघून गेला. आईला वाटले की, तो गावात खेळायला गेला. मात्र संध्याकाळी 5 च्या सुमारास, त्यांच्या शेजाऱ्याने पीडितेच्या पालकांना बाहेर येण्यास सांगितले. जेव्हा पालक गेले तेव्हा त्यांना त्यांच्या घराजवळील ढिगाऱ्यावर टाकलेल्या पॉलिथिनच्या पिशवीतून एका मुलाचे पाय बाहेर पडलेले दिसले. आईने पॅंटवरून आपल्या मुलाची ओळख पटवल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढला. मुलाचा चेहरा रक्ताने माखलेला आढळून आला.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

मुलाच्या गळ्यात निळ्या नायलॉनच्या दोरीसह सायकलची साखळी बांधलेली होती. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते आणि त्याच्या नाकावर आणि कपाळावरही खुणा होत्या, असे वडिलांनी पोलिसांना सांगितले. मुलाच्या वडिलांना 16 वर्षीय आरोपीच्या घरापर्यंत रक्ताचे डाग दिसले. गावातील इतर काही लोकांसह ते आरोपीच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता, त्याने कथितपणे गुन्हा कबूल केला. तसेच या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी सामील असल्याचेही सांगितले.

खेळण्याच्या बहाण्याने बोलावले आणि संपवले

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी मुलाला खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, त्याला जिलेबीचा तुकडा दिला आणि नंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी मुलाला बाथरूममध्ये ठेवलेल्या गोणीत भरला. मुलांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना परिसरातून एक मुलगी जाताना दिसली आणि ते घाबरले. त्यांनी घाईघाईने मृतदेहाची विल्हेवाट लावली. याबाबत स्थानिक बाल कल्याण संघटनांना सहभागी करून घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.