
पुण्यातून अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी आली आहे. एका अभियंत्याने लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवरून उडी मारून आयुष्य संपवलं आहे. मानसिक त्रासातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. या घटनेनंतर पोलिसांनी त्याची शोधाशोध करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या अभियंत्याने मृत्यूपूर्वी पत्नीसह एका परिचिताला शेवटचा मेसेज केला होता. हा मेसेज वाचून सर्वच सुन्न झाले आहेत. ती वेळ टाळता आली नसती का? असा प्रश्न केला जात आहे.
वीरेंद्र सिन्हा असं या बाणेर येथील आयटीत काम करणाऱ्या अभियंत्याचं नाव आहे. पत्नी रियासोबत वाद झाल्याने तो पुण्याहून लोणावळ्याला कारने आला होता. या ठिकाणी आल्यावर त्याने रात्री पत्नीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झाला नाही. त्यामुळे त्याने पत्नीसाठी एक मेसेज आणि व्हिडीओ पाठवला आहे. त्यात त्याने त्याच्या मनातील गोष्ट बोलून दाखवल्याचं सांगितलं जातं. पत्नीसह त्याने मित्रांना आणि परिचितालाही मेसेज पाठवल्याची बाब समोर आली आहे. एका परिचिताला पाठवलेल्या मेसेजमधून त्याने त्याची कार कुठे आहे आणि कारची चावी कुठे आहे याची माहिती दिली होती.
काय होतं या मेसेजमध्ये?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीरेंद्र यांनी एका परिचिताला हा शेवटचा मेसेज केला होता. माझी कार टायगर पॉइंट येथे उभी आहे. गाडीची चावी टायरखाली ठेवली असून मोबाईलही गाडीतच आहे, असं त्याने मेसेजमध्ये म्हटलं होतं. जेव्हा पत्नी रियाने हा मेसेज वाचला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. रिया आणि वीरेंद्रच्या मित्रांनी तात्काळ लोणावळ्याला धाव घेतली. वीरेंद्र यांनी सांगितलेल्या ठिकाणीच निळ्या रंगाची कार होती. चावीही मिळाली आणि मोबाईलही सापडला. पण वीरेंद्र काही दिसत नसल्याने त्यांच्या काळजाची धकधक वाढली. तेवढ्यात पोलिसांनी वीरेंद्र यांचा मृतदेह रिया यांना दाखवला.
मला काही लोक…
वीरेंद्र यांनी मृत्यूपूर्वी एक व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं होतं. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांनी मेल केला होता. मला काही लोक जगू देत नाहीत, अशी वेदना त्यांनी या व्हिडीओतून व्यक्त केली होती. तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाचा पाढाही त्याने वाचला होता. दरम्यान, वीरेंद्र यांची पत्नी रिया यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास सुरू आहे.
अखेर मृतदेह सापडला
वीरेंद्र सिन्हा यांनी पहाटे दरीत उडी मारून जीव दिल्याचं सांगितलं जातं. पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने तब्बल पाच तास शोध मोहीम करून त्यांचा मृतदेह शोधला. त्यानंतर आता त्यांचा मृतदेह पोस्टमार्टेमला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.