Farmer Suicide : उत्पन्नच नाही, कसं फेडू कर्ज? शेतकऱ्याची स्वतःच्या विहिरीतच गळफास घेत आत्महत्या

| Updated on: Jun 27, 2022 | 7:59 AM

Bhandara Farmer Suicide : तीन एकर जागेत उन्हाळी धानाची रोवणी करून त्यावर जवळपास साठ हजार रुपयाच्या वर पैसे खर्च केले.

Farmer Suicide : उत्पन्नच नाही, कसं फेडू कर्ज? शेतकऱ्याची स्वतःच्या विहिरीतच गळफास घेत आत्महत्या
शेतकऱ्याची आत्महत्या
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

भंडारा : शेतकऱ्यानं आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची एक हृदय हेलवणारी घटना भंडाऱ्यातून (Bhandara Suicide) समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एका शेतकऱ्यानं आपल्याच विहिरीत गळफास लावून घेतला आणि जीवनयात्रा संपवली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे भंडारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. उन्हाळी धानाचे काही उत्पन्न शेतकऱ्यांच्या वाट्याला आलं नव्हतं. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला होता. अत्यल्प उत्पादनामुळे कर्जदारांचे (Farmer Loan) कर्ज कसं फेडायची, याची चिंता या शेतकऱ्याला सतावत होती. आर्थिक संकटात सापडलेल्या त्रस्त शेतकऱ्याने अखेर स्वतःच्या शेतावरील विहिरीत गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील टेंभरी इथं घडली.देवराम तुळशीराम शिंगाडे असं शेतकऱ्यांचं नाव असून वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आत्महत्या करत जीव दिलाय.

शेतकऱ्याच्या आत्महत्येनं हळहळ

मृतक देवराम शिंगाडे हे अनेक वर्षापासून शेतीसह पशू व्यवसाय सुद्धा करायचे. या वर्षी तीन एकर जागेत उन्हाळी धानाची रोवणी करून त्यावर जवळपास साठ हजार रुपयाच्या वर पैसे खर्च केले. यासाठी सहकारी संस्थेच्या जवळपास पंचावन्न हजार रूपयांचा कर्ज ही घेतले. मात्र दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ पंधरा पोती धान उत्पादन झाले.

मनासारखं उत्पन्न न निघाल्यानं देवराम यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. गेल्या चारपाच दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. दरम्यान गावाशेजारी असलेल्या शेतावरील विहिरीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

हे सुद्धा वाचा

आत्महत्या कधी थांबणार?

देवराम यांनी आत्महत्या केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असता परिसरातील नागरिकांनी एकाच गर्दी केली होती. दरम्यान लाखांदूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे आता पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखायच्या अशा प्रश्न यानिमित्तानं पुन्हा उपस्थित झालाय.