Agriculture News :खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान, मात्र सहा महिने उलटूनही…

| Updated on: Feb 16, 2023 | 8:49 AM

वाशिम जिल्ह्यात यंदा झालेल्या परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात बियाणे टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Agriculture News :खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान, मात्र सहा महिने उलटूनही...
farmer
Image Credit source: tv9marathi
Follow us on

अमरावती : आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) व जिल्हा कृषी विभागाने (District Agriculture Department) दम भरल्यानंतर पिक विमा कंपनीने (Crop Insurance Company) शेतकऱ्यांना परतावे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्यापही अमरावती जिल्ह्यातील 24 हजार 540 शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहेत. खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. मात्र पीक विमा काढूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही. 1 लाख 10 हजार 652 शेतकऱ्यांनी नुकसानाची तक्रारी केल्या होत्या. तर आतापर्यंत 72 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. मात्र सहा महिने उलटूनही 24 हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चांण यांनी सांगितली.

शेतरस्त्यांसाठी पाडळी शिंदे ग्रामस्थांचे उपोषण सुरू

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पाडळी शिंदे येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री पाणंद रस्ते आणि मातोश्री पाणंद रस्ते योजनेत गावपातळीवर रस्त्यांची कामे करावी, तसेच नदीवरील पुलाचे काम न झाल्यामुळे त्रस्त होऊन गावातीलच नदीपात्रात उपोषण सुरू केले आहे. मागील तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू करण्यात आले असून, बेमुदत उपोषणास बसलेल्या एकाची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी बळजबरीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला आहे. देऊळगाव राजा तहसीलदार यांनी उपोषण कर्त्याला भेट दिली. यावेळी तहसीलदार यांनी संबंधित रस्ते हे योजना बाह्य असल्याने या रस्त्याच्या कामासाठी तत्काळ निधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी उपोषणकर्त्यांना केली आहे. मात्र, उपोषणकर्ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

वाशिम जिल्ह्यात यंदा झालेल्या परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भविष्यात बियाणे टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश प्रकल्पात आजही पाणी साठा उपलब्ध असून या पाण्याच्या आधारे उन्हाळी पिके घेत आहेत. पांगरी नवघरे या गावातील शेत पारिसरातील शेतकरी मुंग पिकाची पेरणी करीत असतानाचं चित्र दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा

द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ

गेल्या पाच-सहा दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकच्या निफाडमध्ये थंडीची लाट कायम असल्याने तालुका गारठून निघाला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 6.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडीच्या पाऱ्यात दररोज चढ-उतार होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. फुगवणीला आलेल्या द्राक्षांना तडे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे द्राक्षांच्या दरावर परिणाम होण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली.