
कोल्हापुरातील आजरा तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिनाभरापूर्वी विवाहबद्ध झालेल्या एका नवदाम्पत्याचा गॅस गिझरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. सागर सुरेश करमळकर (३२) आणि त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (२६) असे या दुर्दैवी दाम्पत्याचे नावे आहे. या घटनेमुळे आजरा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवविवाहित करमळकर दाम्पत्य रविवारी (१५ जून २०२५) दुपारच्या सुमारास आंबोलीत फिरण्यासाठी गेले होते. आंबोलीहून परतल्यानंतर ते आजरा येथील भावेश्वरी कॉलनीतील आपल्या घरी परतले. रविवारी रात्रीपासून त्यांचा फोन लागत नव्हता. कालांतराने त्यांचे फोन बंद स्विच ऑफ झाले. त्यामुळे मित्रपरिवाराला चिंता वाटू लागली.
यानंतर सोमवारी १६ जून रोजी सकाळी त्यांच्या मित्रपरिवाराने घरी जाऊन चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले. ते राहत असलेल्या घरामध्ये सर्वत्र गॅसचा तीव्र वास येत होता. यानंतर त्यांच्या मित्रपरिवाराने शोध घेतला असता ते दोघेही बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळले. गॅस गिझरमधून गॅसची गळती झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सागर करमळकर यांचा मित्रपरिवारात मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेने आजरा परिसरावर शोककळा पसरली आहे. गॅस गिझरच्या वापराबाबत योग्य ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.