बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या दीड कोटींचं लाच प्रकरण, तपासात उकललं विवाहबाह्य संबंधातून झालेल्या एका हत्येचं गूढ

| Updated on: Aug 14, 2021 | 9:08 AM

सेलू येथे राहणाऱ्या सुरेश करवा यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर या घटनेची उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. त्यातच सुरेश करवा याची पत्नी आणि राहुल कासट यांचे संभाषण समाज माध्यमावर व्हायरल झाले, आणि हा अपघात नसून त्यांचा खून करण्यात आल्याचे पुढे आले.

बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या दीड कोटींचं लाच प्रकरण, तपासात उकललं विवाहबाह्य संबंधातून झालेल्या एका हत्येचं गूढ
परभणी येथील लाच प्रकरणात धक्कादायक वळण
Follow us on

प्रशांत चालिंद्रवार, टीव्ही 9 मराठी, परभणी : सेलू येथील दीड कोटींच्या लाच प्रकरणाला नाट्यमय वळण लागले आहे. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह दोघांना लाच प्रकरणी अटक करण्यात आल्यामुळे या प्रकरणाने आता मोठी कलाटणी घेतली आहे. या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या सेलू येथील सुरेश करवा यांचा अपघात झाला नसून सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अनैतिक संबंधातून सुरेश करवा यांचा खून करण्यात आला असून या खुनाचा सूत्रधार राहुल कासट याला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य चार आरोपींच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र हा अपघात नसून हत्या असल्याचा बनाव उघड होण्यामागील घटनाक्रम थरारक आहे.

काय आहे प्रकरण?

सेलू येथे राहणाऱ्या सुरेश करवा यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर या घटनेची उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. त्यातच सुरेश करवा याची पत्नी आणि राहुल कासट यांचे संभाषण समाज माध्यमावर व्हायरल झाले, आणि हा अपघात नसून त्यांचा खून करण्यात आल्याचे पुढे आले.

या प्रकरणातून सुखरुप बाहेर काढण्यासाठी सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी 2 कोटींची लाच मागितल्याचा आरोप झाला होता. अखेर दीड कोटी रुपये देण्याचं ठरलं. पण ज्याच्याकडे लाच मागितली, त्या व्यक्तीने पद्धतशीरपणे सर्व प्रकार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगत तक्रार केली. त्यानंतर पाल यांना दहा लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

सुरेश करवा यांची हत्या कशी झाली?

दरम्यान, सुरेश करवा यांच्या हत्येच्या कटात गायत्री नगर सेलू येथील 36 वर्षीय जितेंद्र उर्फ भरतसिंग ठाकूर याला राहुल कासट याने सुरूवातीला सहभागी करून घेतले. त्यानंतर राहुलने त्याच्याकडे काम करणारा हमाल विनोद भारत अंभोरे आणि विशाल सुरेश पाटोळे या दोघांना कटाची माहिती दिली. तसेच रोख रकमेची सुपारी देऊन सुरेश करवा यांचा खून करण्याच्या कटात सामील करून घेतले.

घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?

करवा हे रवळगाव मार्गावरील पुलाजवळ आले असतानाच राजेभाऊ खंडागळे याने त्यांच्या मोटर सायकलला धडक देऊन खाली पाडले. तो पळून जाताना पाठीमागे मोटरसायकलवर असलेल्या विनोद अंभोरे आणि विशाल पाटोळे यांनी आपली मोटरसायकल थांबवून करवा यांना काही कळण्याच्या आतच, दगड आणि लोखंडी सबलने त्यांच्या डोक्यात वार केले. त्यांना जीवे ठार मारून हे आरोपी तिथून परत सेलूला आले. मुख्य सूत्रधार कासट याच्याकडून पैसे घेऊन प्रकरण शांत होईपर्यंत जालना येथे पळून गेले.

मुख्य सूत्रधार असलेल्या कासट यानेही अपघाताचा बनाव रचला. पोलिसांच्या तपासात या सर्व बाबी उघड झाल्या. त्यातून आरोपी राहुल कासट यास हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि इतर तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

दीड कोटींचं डील, पोलिसाला दहा लाख घेताना रंगेहाथ पकडलं, मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याला झटका