आईनेच मुलाच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी , तिने असं का केलं ?

| Updated on: Mar 29, 2024 | 1:59 PM

एका आईने तिच्याच मुलाच्या अंगावर गरम, उकळतं पाणी फेकलं. तिची क्रूरता एवढ्यावरच थांबला नाही, तिने त्या गरम पाण्यात लाल मिरचीची पावडरही टाकली होती. बदलापूरच्या साई वालवली गावातील या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे

आईनेच मुलाच्या अंगावर फेकलं उकळतं पाणी , तिने असं का केलं ?
Follow us on

आई हे नाव ऐकताच आपल्या चेहऱ्यावर एक छान हास्य येतं. आईसोबतचे प्रेमळ , आनंदाचे क्षण आठवतात आणि चेहऱ्यावर हसू विलसत राहतं. पण आई हा शब्द ऐकताच एखाद्याला भीती वाटत असेल तर ? आईच आपल्या पोटच्या गोळ्याच्या जीवावर उठली तर ? वाचूनही कसंतरी वाटतं ना, पण बदलापुरात हे खरंच घडलं आहे. तिथे एका आईने तिच्याच मुलाच्या अंगावर गरम, उकळतं पाणी फेकलं. तिची क्रूरता एवढ्यावरच थांबला नाही, तिने त्या गरम पाण्यात लाल मिरचीची पावडरही टाकली होती. बदलापूरच्या साई वालवली गावातील या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. या दुर्दैवी घटनेत भाजलेल्या त्या इसमाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलावर उकळते पाणी फेकणाऱ्या त्या महिलेवर अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही, ना तिला ताब्यात घेण्यात आलंय. ती अजूनही गावात तशीच बिनधास्त फिरत आहे.

काय आहे प्रकरण ?

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव मोहन असे असून तो बदलापूरच्या साई वालवली गावात राहतो. घटनेच्या दिवशी मोहन याला सुट्टी असल्यामुळे तो घरीच होता तर त्याची पत्नी ही कामाला गेली होती. दुपारच्या सुमारास मोहन घरात जेवायला बसला होता, तेवढ्यात त्याची आी घरी आली आणि तिने त्याच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं. एवढंच नव्हे तर तिने त्या पाण्यामध्ये लाल मिरचीची पावडरही टाकली होती.

उकळत्या पाण्यामुळे मोहन पूर्णपणे भाजला. त्याचा आरडाओरडा ऐकून शेजारचे धावत आले आणि त्यांनी त्याला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपाचारांसाठी दाखल केले. त्याची प्रकृती अद्याप गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

का फेकलं पाणी ?

मिळालेल्या माहितीनुसार, मोहनच्या आईचा तिच्या सुनेवर, म्हणजेच मोहनच्या बायकोवर राग होता असे समजते. तिने त्याच्या अंगावर गरम पाणी फेकतानाच बडबड केली. तुझ्या बायकोने सगळं बरबाद केलं, तिला सोडून दे असं ती म्हणत होती. प्रॉपर्टीच्या वादातून तिने हा हल्ला करत गरम पाणी फेकलं असं सांगितलं जात आहे. सुनेमुळे सगळं बरबाद झाल्याची त्याच्या आईची भावना होती. सुनेला सोडून दे, असं तिने अनेकवेळा मुलाला सांगितलं होतं, मात्र त्याने न ऐकल्याने त्याच रागातून तिने हे कृत्य केलं.

दरम्यान या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी मोहनच्या आई विरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. मोहनची आई अजूनही गावात बिनधास्त फिरत आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करत तिला अटक करून कडक कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.