नवी मुंबईतील वृद्धाच्या हत्येचा उलगडा, दुकानदाराच्या पत्नीकडे विकृत मागणी, नवरा संतापला अन्…

| Updated on: Oct 11, 2021 | 1:03 PM

Murder in Navi Mumbai | सीसीटीव्ही फुटेजमुळे या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळाले. 29 ऑगस्टला शामकांत नाईक यांचा मुलगा ते बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी आरोपी मोहन चौधरीही त्यांच्यासोबत उपस्थित होता.

नवी मुंबईतील वृद्धाच्या हत्येचा उलगडा, दुकानदाराच्या पत्नीकडे विकृत मागणी, नवरा संतापला अन्...
संग्रहित छायाचित्र
Follow us on

नवी मुंबई: काही दिवसांपूर्वी घडलेल्या शामकांत नाईक या वृद्धाच्या हत्याप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांना शनिवारी एका डबक्यात शामकांत नाईक यांचा मृतदेह मिळाला होता. यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान मोहन चौधरी या दुकानदाराला ताब्यात घेतले होते. शामकांत नाईक वारंवार माझ्या पत्नीशी शरीरसंबंध ठेवून देण्याची मागणी करत होते. याच रागातून आपण त्यांना खून केल्याची कबुली मोहन चौधरी याने दिल्याचे समजते.

सीसीटीव्ही फुटेजमुळे या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळाले. 29 ऑगस्टला शामकांत नाईक यांचा मुलगा ते बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी आरोपी मोहन चौधरीही त्यांच्यासोबत उपस्थित होता. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा 31 ऑगस्टला मोहन चौधरी बाईकवरुन चादरीत गुंडाळून मृतदेह घेऊन जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी मोहन चौधरीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा मोहन चौधरीने आपणच शामकांत नाईक यांचा खून केल्याची कबुली दिली.

पत्नीशी शरीरसंबंध ठेऊन देण्याची मागणी

शामकांत नाईक हे वारंवार माझ्या दुकानात येऊन माझ्या पत्नीशी शरीरसंबंध ठेऊन देण्याची मागणी करत होते. त्यांनी पहिल्यांदा मला 5000 रुपये देऊ केले. मी नकार दिल्यानंतर ते निघून गेले. काही दिवसांनी ते पुन्हा माझ्या दुकानात आले आणि अशीच विकृत मागणी केली. त्यावेळी मी त्यांना धक्काबुक्की केली असता त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यानंतर मी दुकानाचे शटर बंद करुन शामकांत नाईक यांना मारून टाकले. 31 ऑगस्टपर्यंत मी त्यांचा मृतदेह दुकानातील वॉशरुममध्ये लपवून ठेवला होता. 31 ऑगस्टला हा मृतदेह चादरीत लपेटून मी डबक्यात फेकून दिल्याचे मोहन चौधरी याने सांगितले.

शामकांत नाईकांच्या मुलाने आरोप फेटाळले

कोणतीही फौजदारी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन असून आज आमची समाजामध्ये बदनामी होत आहे. तरी या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी सखोल चौकशी करुन हत्येचा तपास योग्य दिशेने करावा आणि नाईक कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी शामकांत नाईक यांचे सुपुत्र शेखर शामकांत नाईक यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

माझे वयोवृध्द वडील हे अध्यात्मिक विचारांचे होते. तसेच, माझ्या वडिलांची आतापर्यंत कोणतीही गुन्हेगारी आणि चारित्र्यहीन पार्श्वभूमी नाही. त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबाची समाजामध्ये असलेल्या प्रतिष्ठेचा भंग करण्यासाठी माझ्या वडीलांवर चुकीचे आरोप करण्यात आलेले आहेत. एकीकडे वडील गेल्याच्या दुःखाचे सावट आम्हा नाईक कुटुंबीयांवर असताना दुसरीकडे स्वर्गीय वडिलांचे चारित्र्य हनन करण्याचे प्रकार समाजमाध्यमातून सुरु आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांची समाजात नाहक बदनामी होत असून संपूर्ण कुटुंब मानसिक तणावातून जात आहे. तरी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी आम्हा नाईक कुटुंबीयांना न्याय देण्याच्या दृष्टीने या प्रकरणाचा योग्य तपास करून सत्य उजेडात आणावे, अशा मागणीचे निवेदन शेखर नाईक यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहे.

संबंधित बातम्या :

“सॉरी, कोरोना व्हॅक्सिन असल्याचं माहित नव्हतं” चिठ्ठी लिहून माफी, चोरलेले शेकडो डोस परत

सोन्या-चांदीची नाही, गाड्यांचीही नाही, हे लुटारु काय लुटतायत बघा? पोलीसही अवाक