आठ वर्ष मुंबईतच पोस्टिंग, बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणार, 727 जणांची यादीही तयार

| Updated on: Jun 30, 2021 | 12:49 PM

आठ वर्षांपेक्षा जास्त काळापासून मुंबईत तैनात असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची लवकरच राज्याच्या इतर भागात ट्रान्सफर केली जाणार आहे.

आठ वर्ष मुंबईतच पोस्टिंग, बड्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणार, 727 जणांची यादीही तयार
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींची वसुली करण्याचे कथित आदेश दिल्याच्या प्रकरणात सचिन वाझेसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचार आणि तत्सम गंभीर आरोप लक्षात घेत पोलीस विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत आठ वर्ष पूर्ण केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची आता अन्यत्र बदली केली जाणार आहे. मुंबई पोलिसातील 727 अधिकाऱ्यांच्या नावांची यादीही तयार असल्याची माहिती आहे. (Mumbai Police officers who completed 8 years to be transferred in Maharashtra)

राज्याच्या अन्य भागात बदली

आठ वर्षांपेक्षा जास्त काळापासून मुंबईत तैनात असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची लवकरच राज्याच्या इतर भागात ट्रान्सफर केली जाणार आहे. मुंबई पोलिसातील संबंधित 727 अधिकाऱ्यांना मुंबई शहराबाहेरील आपल्या पसंतीच्या तीन जागा निवडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस विभागातील भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढण्यासाठी ही पावलं उचलली जात आहेत.

परमबीर सिंह यांचे लेटरबॉम्ब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे मुंबईत वसुली करणारी संघटित गुन्हेगारी फोफावल्याचं चित्र समोर आलं होतं. यामध्ये पोलिसांचा समावेश असल्याने जनसामान्यातील प्रतिमेला तडा गेला होता. याशिवाय मुंबई पोलिसातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावंही भ्रष्टाचार प्रकरणात वारंवार समोर येत आहेत.

पत्रात काय होते?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात (तत्कालीन) गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल, असा दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांच्या मुलाला अटक, पत्नीच्या तक्रारीनंतर बेड्या

वय 72, कोरोनाचा धोका, अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, चौकशीला गैरहजेरी

(Mumbai Police officers who completed 8 years to be transferred in Maharashtra)