Explainer : भाजपा बॅकफुटवर, काँग्रेसला नवसंजीवनी; CJP च्या आंदोलनामुळं काय बदलणार? 5 मुद्द्यात समजून घ्या!
आता विरोधकांना वातावरण ढवळून काढण्यासाठी एक चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा विरोधक कसा फायदा घेणार? तरुण, समान्य नागरिकांचा विश्वास विरोधक कसा जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

CJP Delhi Protest : नीट पेपरफुटीचा मुद्दा सध्या देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हा मुद्दा केंद्रस्थानी आणण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने सोशल मीडिया तसेच प्रत्यक्ष मैदानावरची लढाई चालू केली. विशेष म्हणजे या दोन्ही लढायांत कॉकरोच जनता पार्टीला आतापर्यंत यश मिळत गेलं आहे. देशाच्या राजकीय आणि समाजिक जीवनात कित्येक वर्षानंतर पहिल्यांद जनता शिक्षणाच्या मुद्द्यावर एका छाताखाली आली आहे. सीजेपीने उभ्या केलेल्या या आंदोलनामुळे आगामी काळात राजकारणात मूलगामी परीणाम होणार आहेत. सत्ताधारी भाजपा, सहयोगी पक्ष तसेच विरोधकांनीही आपापाल्या राजकारणाची नवी रेष ओढावी लागणार आहे. म्हणूनच आता सीजेपीच्या आंदोलनामुळे राजकारणात काय बदल होणार? विरोधक सध्या कुठे आहेत? तसेच देशातील जनता या आंदोलनाकडे नेमकं कसं पाहते? ते 5 मुद्द्यांत समजून घेऊ या…
1) काँग्रेस सध्या कुठे आहे?
गेल्या साधारण महिन्याभरापासून सीजेपीचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. त्यानंतर अभिजित दीपके यांनीही उपोषणाला सुरुवात केली. सीजेपीने 20 जुलै रोजी ‘संसद मार्च’ची हाक दिली होती. या मोर्चात देशातील हजारो तरुणांनी सहभागी व्हावे. दिल्लीत यावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचाच परिणाम म्हणून हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर तर हे आंदोलन जास्तच चिघळले. सध्याची हवा ओळखून आता काँग्रेसनेही या आंदोलनात उडी घेतली आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. परंतु लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र अजूनही दीपके यांची किंवा जंतरमंतरवर आंदोलकांची भेट घेतलेली नाही. काँग्रेसने विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी मात्र आपले वेगळे आंदोलन सुरू केले. सध्याच्या परिस्थितीत आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
2) काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी?
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केल्याचे दिसले. संसदेतही सरकारला यावर प्रश्न विचारला. संसदेत गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करण्याची वेळ सरकारवर आली. दुसरीकडे संसदेत चर्चा होत नाही हे लक्षात आल्यानंतर काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापुढेच ठिय्या आंदोलन सुरू होते. साधारण साडे तीन तास हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच अनेक महत्त्वाचे नेते सहभागी झाली होती. त्यांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या या आंदोलनाची देशभरात चर्चा मिळाली. राहुल गांधी यांना पोलीस घेऊन जातानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या पायातील एक बूट गायब झाल्याचे दिसले. लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्याची ही अवस्था पाहून देशातील अनेकांनी संताप व्यक्त केला. एका अर्थाने काँग्रेसमध्ये नवचेतना निर्माण झाल्याचेही बोलले आहे. गेल्या साधारण दशकभरापासून काँग्रेसला ‘भारत जोडो यात्रा’ वगळता अन्य कोणतेही मोठे आंदोलन उभारता आलेले नाही. विद्यार्थ्यांचा हा मुद्दा लावून धरून पक्षात काही नवसंजीवनी पेरता येते का? यासाठी हे प्रयत्न चालू आहेत.
3) भाजपाला धक्का, सीजेपीमुळे बॅकफुटवर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत येण्याआधी असेच आंदोलन हे अण्णा हजारे यांनी उभे केले होते. भाजपा सत्तेत आल्यानंतर मात्र आतापर्यंत एकदाही अशा प्रकारचे मोठे आंदोलन उभे राहिलेले नाही. सीजेपीचे हे पहिलेच देशव्यापी आणि सामान्यांचे लक्ष वेधून घेणारे आंदोलन ठरले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यातही शिक्षणाच्या मुद्द्यावर हे आंदोलन असल्याने सरकारची एका प्रकारे कोंडी झाली आहे. सीजेपीवर कोणत्याही प्रकारचे आरोप सरकारला करता येत नाहीयेत. गेल्या 12 वर्षांपासून मोदी सरकारमधील एकाही नेत्याचा राजीनामा झालेला नाही. परंतु आता थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याने हा एका प्रकारे भाजपाला धक्का असल्याचे बोलले जात आहे. तरुणांचा आक्रमक पवित्रा, मागण्यांचा रेटा आणि विरोधी पक्षांनी तापवलेले वातावरण यामुळे सरकार एका प्रकारे बॅकफुटवर गेल्याचे बोलले जातेय. आम्ही पेपरफुटी, विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज यावर संसदेत चर्चा करायला तयार आहोत, अशी भूमिका ही याचाच एक भाग असल्याचे म्हटले जातेय.
4) सीजेपीच्या आंदोलनाचा संदेश काय?
सीजेपीचे आंदोलन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून उभा राहिलेला लढा आहे. या लढ्याची आणखी एक विशेषता म्हणजे हे आंदोलन तरुणांनी आपल्या हाती घेतले आहे. देशात शिक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे, हा मुद्दा आता अधोरेखित झाला आहे. सोबतच तरुणांना गृहित धरू नका, असाही एक महत्त्वाचा संदेश सत्ताधारी तसेच विरोधकांना मिळालाय. या आंदोलनामुळे येथील तरुणांचा मनात काय आहे? तरुणांचे मुद्दे काय आहेत? याचा अभ्यास आता सरकारला करावा लागणार आहे.
5) पुढे काय होणार?
दरम्यान, आता विरोधकांना वातावरण ढवळून काढण्यासाठी एक चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा विरोधक कसा फायदा घेणार? तरुण, समान्य नागरिकांचा विश्वास विरोधक कसा जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे सरकारची जी प्रतीमा खराब झाली आहे, त्यातून सरकार कसे बाहेर पडणार? भविष्यातील आव्हानांना समोरे जाण्यासाठी भाजपा काय राजकीय खेळी खेळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
