Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. नीट पेपर फुटी तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेवर राहुल गांधी यांनी बोट ठेवले आहे. सोबतच त्यांनी सरकारकडे तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

Rahul Gandhi Press Conference : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. काहीही झालं तरी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका सीजेपीची आहे. काँग्रेसनेही हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. 21 जुलै रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोरच साडे तीन तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला घेरलं आहे. नीट पेपरफुटी तसेच विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हे मुद्दे उपस्थित करत त्यांनी मोदी सरकारकडे तीन मोठ्या मागण्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या तीन मागण्या आहेत, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
मला माझी पर्वा नाही, परंतु विद्यार्थ्यांना…
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत? याबाबत भाष्य केलं. विद्यार्थ्यांसोबत अमानुषपणे वागणूक देण्यात आली आहे. माझ्यासोबत जो व्यवहार झाला, त्याची मला पर्वा नाही. आणखी पाच वेळा जरी माझ्यासोबत असाच व्यवहार झाला तरी मला त्याचे काहीही वाटणार नाही. परंतु विद्यार्थ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे म्हणत आमचा लढा चालूच राहील, असे संकेत त्यांनी दिले.
राहुल गांधी यांनी काय मागण्या केल्या?
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत विद्यार्थ्यांच्या वतीने एकूण तीन मागण्या केल्या आहेत. यात सर्वात पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची, विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, अशी दुसरी मागणीदेखील त्यांनी केली. विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, अत्याचार झाला हे मान्य करून मोदींनी मोठ्या मनाने माफी मागावी, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच ज्यांनी विद्यार्थ्यांसोबत मारहाण केलेली आहे, त्यांना या प्रकरणात जबाबदार धरले पाहिजे, अशी तिसरी मागणी राहुल गांधींनी केली. दरम्यान, आता या मागण्यांवर सरकार नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
