मुंबई : मुंबईत पश्चिम रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाईंदर रेल्वे स्टेशनवरील ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वायरच्या स्टोअरमध्ये ठेवलेल्या 24 लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या तांब्याच्या वायरची चोरी झाली होती. संबंधित चोरीची घटना समोर आल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचा तपास करत असताना रेल्वे पोलिसांना मोठं यश आलंय.
संबंधित घटनेबाबत पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, भाईंदर स्टेशनवर ओएचई (ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वायर) स्टोअरमध्ये ठेवलेल्या तांब्याच्या वायरची चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई केली. रेल्वे पोलिसांचे बोरीवली, भाईंदर येथील पथक तसेच सीआयबीचे देखील एक पथक या प्रकरणाचा तपास करत होते. तपासादरम्यान दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.
विशेष म्हणजे रेल्वे पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता या चोरीच्या घटनेतील एक-एक गुंता हळूहळू उलगडत गेला. एकामागेएक अशा आरोपींची चौकशी करत रेल्वे पोलीस तब्बल 29 आरोपींना पकडण्यात यशस्वी ठरले. विशेष म्हणजे आरोपींची चोरी करण्याची पद्धत आणि त्यांच्या धाडसाविषयी ऐकून पोलीसही चक्रावले. पण या शातीर चोरट्यांना बेड्या ठोकण्यात रेल्वे पोलिसांना अखेर यश आलं.
या प्रकरणावर त्वरीत कारवाई करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. टीमने केवळ 20 दिवसात हे प्रकरण सोडवले. या प्रकरणासाठी गठीत केलेल्या विशेष पथकाने सर्व आरोपींची कसून चौकशी करत पद्धतशीरपणे या केसवर काम केले, ज्यामुळे 19 सहकारी आणि 10 चोरांसह सर्व 29 गुन्हेगारांना अटक झाली. रेल्वे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आलंय.
पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी माहिती दिली की, आरपीएफच्या विशेष पथकाने एकूण 24 लाख 50 हजार 880 रुपये किंमतीची 2,960 मीटर चोरलेल्या OHE कॉपर वायरसह गुन्ह्यात सामील 4 वाहने जप्त केले. सर्व 29 आरोपींना रेल्वे दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा :
लिंबोणीच्या झाडामध्ये गांजाची लागवड, पोलिसांनी सुगावा लागला, छापा टाकून 9 लाखांचा गांजा जप्त!
घरातील तिघांनी आधी उंदिर मारायचं औषध घेतलं, नंतर पोलिसांना फोन, पण जे नको घडायला होतं ते घडलंच