IND vs ZIM: झिम्बाब्वेत सूर्यवंशीचं ‘वैभव’ परतलं, 18 चेंडूत ठोकलं अर्धशतक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पहिला टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष होतं. त्याने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला नाही. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धुतलं आणि सर्व कसर भरून काढली.

टी20 मालिकेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल गमावला आणि त्यांच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 125 धावा केल्या. तसेच विजयासाठी 126 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान तसं सोपं होतं. पण सर्वांच्या नजरा या वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे लागून होत्या. कारण इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका त्याच्यासाठी काही खास गेली नाही. त्या मालिकेतील तिन्ही सामन्यात फेल गेला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात काय करतो याकडे लक्ष लागून होते. वैभव फलंदाजी आला आणि त्याने सावध सुरूवात केली. त्यामुळे त्याच्या फलंदाजीचा अंदाज बदलला की काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमी आणि त्याच्या चाहत्यांना पडला. वैभव सूर्यवंशीने पहिले तीन चेंडू निवांत खेळले पण त्यानंतर आपल्या भात्यातून चौकार आणि षटकार काढले.
वैभव सूर्यवंशीचा आक्रमक पवित्रा
वैभव सूर्यवंशीने चौथ्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला. रिचर्ड नगारवाला उत्तुंग षटकार मारला आणि आपली शैली कायम असल्याचं दाखवून दिलं.पुढच्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर लगेचच षटकार मारत आपला आक्रमक बाणा दाखवला. त्याच्या जोडीला आलेला अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतरही त्याच्या आक्रमक शैलीत काही फरक पडला नाही. वैभव सूर्यवंशीने समोर येईल त्या गोलंदाजाला फोडून काढला. त्याच्या प्रत्येक प्रहारानंतर विजयी धावांचं अंतर कमी होत होतं. तसेच त्याच्या धावसंख्येतही भर पडत होती. त्याच्या बॅटमधून अर्धशतक यावं अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा होती आणि ती पूर्ण देखील झाली.
वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक
वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 277.78 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतलं पहिलं अर्धशतक चौथ्या सामन्यात केलं. या अर्धशतकी खेळीसह त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरूवात केली आहे. अर्धशतकी खेळी झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी फार काळ तग धरू शकला नाही. पुढच्या चेंडूवर रिचर्ड नगारावाने त्याची विकेट काढली. वैभव 19 चेंडूत 50 धावा करून परतला. पण या 50 धावा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत.
