Buldana Accident : भरधाव कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली! कारमधील 5 जणांचं काय झालं?

| Updated on: Oct 31, 2022 | 12:16 PM

मागील 4 महिन्यात ज्या पुलावरील 4 अपघात, 4 ठार, आता पुन्हा एकदा त्याच पुलावर अपघाताचा थरार

Buldana Accident : भरधाव कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली! कारमधील 5 जणांचं काय झालं?
थरारक अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघात (Buldana Accident) घडला. भरधाव कार पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली. या कारमध्ये पाच प्रवासी होते. हे सर्व प्रवासी जखमी झालेत. त्यातील तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जालना खामगाव महामार्गावरील जांभोरा पुलावर (Jambhora Bridge,Buldana) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही महिन्यात याच पुलावर अनेकदा अपघात होऊन लोकांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा थरारक अपघात (Buldana car accident) घडल्यामुळे या पुलावरुन प्रवास करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-जालना मार्गावर देऊळगाव राजा या गावाजवळ जांभोरा पुलावरुन धावती कार थेट नदीत कोसळली. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

MH 20 EY 0488 या क्रमांकाची ही कार होती. या अपघातामध्ये कारच्या समोरच्या बाजूसह मागच्या बाजूलाही जबर फटका बसला. अपघातानंतर कारमधील प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं आणि त्यांची रवानगी तातडीने रुग्णालयात करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

यावेळी कारमध्ये एकूण 5 प्रवासी होते. या पाचही प्रवाशांना जबर जखम झाली असल्याचं कळतंय. जखमी प्रवाशांना खासगी तसंच शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, नेमका हा अपघात कशामुळे घडला, हे कळू शकलेलं नाही. मात्र चालकांचं नियंत्रण सुटल्यानं किंवा चालकाला झोप आली असल्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात याच पुलावर सातत्यानं अपघात होत असल्याच्या घटना घडल्यात. त्यानंतर आता कार थेट नदीत कोसळल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. जांभोरा पुलावरुन प्रवास करणारे वाढत्या अपघातामुळे धास्तावले आहेत. गेल्या चार महिन्यात याच पुलावर चार अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात एकूण चौघांचा मृत्यू झाला होता.