क्षुल्लक वाद जीवावर बेतला; 24 तासात तिहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली

दोन हत्या नागपूर शहरात तर एक हत्या ग्रामीण भागात घडल्याचे समोर आले आहे. या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे.

क्षुल्लक वाद जीवावर बेतला; 24 तासात तिहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली
24 तासात तिहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 14, 2022 | 1:44 PM

नागपूर : नागपुरात गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासात झालेल्या तिहेरी हत्याकांडाने नागपुरात खळबळ माजली आहे. दोन हत्या नागपूर शहरात तर एक हत्या ग्रामीण भागात घडल्याचे समोर आले आहे. या हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. मात्र गुन्हेगारी कमी झाल्याचा पोलिसांचा दावा गुन्हेगारांनी खोडून काढल्याचे दिसते.

जुन्या वादातून लष्करी बाग भागात एकाची हत्या

हत्येची पहिली घटना ही पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या लष्करीबाग भागात घडली आहे. रोहन शंकर बिहाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास तिघांनी चाकू आणि लोखंडी रॉडने रोहनवर हल्ला केला. ज्यामध्ये रोहनचा मृत्यू झाला आहे.

आरोपी वीरेंद्र उर्फ बाबू बकरी, यशोदास उर्फ सॅनकी आणि अश्विन या तिघांसोबत रोहनचा वाद सुरू होता. रात्री रोहन वस्तीत बाहेर हात शेकत असताना त्यांच्यात जुना वाद उफाळून आला आणि याच वादातून तिघांनी मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

इमामवाडा येथे दारुच्या नशेत झालेल्या वादातून एकाची हत्या

हत्येची दुसरी घटना नागपूरच्या इमामवाडा भागात घडली आहे. दोन आरोपींनी मिळून एकाची हत्या केली. रामसिंग ठाकूर असे मयत इसमाचे नाव आहे. किरकोळ वादातून दोन मजुरांनी संगनमताने रामसिंगची हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे.

मृतक रामसिंग ठाकूर आणि आरोपी राजू बुरडे मुकेश अंबुरे हे तिघेही मजूर असून इमामवाडा येथील झोपडपट्टीत एकत्र राहत होते. तिघांना दारूचे व्यसन असून, क्षुल्लक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. या वादातून राजू आणि मुकेश यांनी रामसिंगच्या डोक्यावर वार केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपींनी रामसिंगचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर दोन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

गंगापूर शिवारात तिसरी हत्या

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीच्या टाकळघाट परिसरातील गंगापूर शिवारात हत्येची तिसरी घटना घडली. सुनील गुलाबराव भजे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. सुनील पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दोघांनी लोखंडी रोडने हल्ला करून त्यांची हत्या केली. दिलीप गेडाम आणि वंश उर्फ दादू मांजी असे आरोपींचे नावं असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us