राज्यातील नागरिकांच्या रक्षणाची जबादारी पोलिसांवर असते. पोलीस दलाचे घोषवाक्य “सद् रक्षणाय खलनिग्रहणाय” आहे. त्याचा अर्थ महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत. परंतु पोलीस दुर्जनांसारखे वागू लागल्यावर काय होणार? नागपूरमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. 13 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. वाठोडा पोलीस ठाणे अंतर्गत जबलपूर मार्गावर प्रेयसी सोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला दोन पोलिसांनी धमकी दिली. त्यांच्याकडील सोन्याचा ऐवज लुटून नेला. अडीच लाखांचा हा ऐवज होता. अखेर या प्रकरणाची चौकशी करुन संदीप यादव आणि पंकज यादव या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले.
नागपूरमधील गणेशपेठमधील एक युवक हा १३ एप्रिल रोजी युवतीसोबत कारमध्ये बसला होता. दोघेही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारमध्ये अनैतिक प्रकार करत होते. त्यावेळी कळमना ठाण्यातील पोलीस कर्मचारी पंकज यादव आणि संदीप यादव आले. त्यांनी त्या प्रियकर, प्रेयसीला कारमधून बाहेर काढले. त्यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. तसेच तुमच्या कुटुंबियांनाही पोलीस ठाण्यात बोलवून बदनामी करण्यात येईल, असे धमकावले. त्यांच्याकडून पंकज आणि संदीपने यांनी पैसे मागितले. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितले मग त्यांनी त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र घेतले. तसेच युवकाच्या गळ्यात असणारी सोनसाखळी घेतली. त्यानंतर सोडून दिले.
पोलिसांनीच लुटल्यामुळे त्या युवकाने प्रेयसीला घरी सोडले अन् थेट पोलीस ठाणे गाठले. त्याने पंकज यादव आणि संदीप यादव यांच्यासंदर्भात तक्रार केली. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या निर्देशानंतर चौकशी करण्यात आली. या प्रकरणाची वाथोडा पोलिसांनी चौकशी केली असता चोरीचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती.
तसेच चौकशीत दोन्ही पोलीस दोषी आढळले. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीसांनी केलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलाची बदनामी झाली आहे. यामुळे पोलीस आयुक्तांनी दोन्ही आरोपींविरोधात कठोर पाऊल उचलले.