पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल… गळा घोटत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल

| Updated on: Jan 20, 2024 | 12:34 PM

12 डिसेंबरला कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेली वैष्णवी पुन्हा घरी आलीच नाही. ती बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच दिवशी तिच्या पालकांनी कळंबोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. त्या शोधादरम्यान पोलिसांना एका तरूणाचा मोबाईल सापडला आणि त्यात एक व्हॉईस नोट सापडली. त्यामध्ये ' पिल्लू, २ मिनिटं हा, जास्त त्रास होणार नाही, मग आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू' अशी समजूत काढणारा आवाज ऐकू आला.

पिल्लू फक्त दोन मिनिटं त्रास होईल... गळा घोटत त्याने गर्लफ्रेंडला संपवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल
Follow us on

मुंबई | 20 जानेवारी 2024 : नवी मुंबईतून गायब झालेल्या एका 19 वर्षांच्या तरूणीच्या मृत्यूसंदर्भात धक्कादायाक माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या त्या तरूणीच्या हत्येचं गूढ उलगडण्यास पोलिसांना यश आलं. वैष्णवी बाबर हिची तिच्या प्रियकराने हत्या केली आणि नंतर स्वत:चंही जीवनही संपवलं. त्याने लिहीलेल्या एका चिठ्ठीतील कोडमधून पोलिसांनी वैष्णवीच्या हत्येचा आणि मृतदेहाचा तपास लावला. त्याच वेळी पोलिसांना तिची हत्या करणाऱ्या तरूणाच्या मोबाईलमध्ये एक व्हॉइस नोटही सापडली. त्यामध्ये ‘ पिल्लू, २ मिनिटं, जास्त त्रास होणार नाही, मग आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू’ अशी समजूत काढणारा आवाज ऐकू आला.

24 वर्षीय आरोपी वैभव बुरुंगळेने खारघर येथे वैष्णवीची हत्या करून तिचा मृतदेह तिथेच सोडला. नंतर त्याने रेल्वेखाली झकून देत स्वत:लाही संपवलं. मात्र प्रेमकहाणीचा हा अंत का झाला, हे समजून घेऊ.

वैष्णवी बाबर (19) आणि वैभव बुरंगले (24) हे कळंबोली परिसरात जवळजवळ रहायचे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं, लग्नही करायचं होतं, पण कुटुंबियांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. 12 डिसेंबरला कॉलेजला जाण्यासाठी वैष्णवी घराबाहेर पडली, पण ती परत आलीच नाही. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र या तक्रारीला महिना उलटून देखील पोलिसांना तिचा काहीच सुगावा लागत नव्हता.

अखेर या घटनेचा तपास गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपवण्यात आला आणि तपासासाठी पथक नेमण्यात आलं. वैष्णवीच्या शोधासाठी या पथकाने तिच्या कॉलेजपासून तपासाला सुरुवात केली होती. ती एका तरूणासोबत रेल्वेने प्रवास करताना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर खारघर स्थानकात उतरून ती टेकडीच्या दिशेने गेली. मात्र टेकडीवरून तो तरूण एकटाच खाली आला. त्यामुळे टेकडीवरच तिच्यासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला.

त्यामुळे पोलिसांनी हत्येपुर्वी वैष्णवी ज्या तरूणासोबत दिसली त्या तरूणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. वैष्णवी बेपत्ता झाली त्याच दिवशी, 12 डिसेंबरला एका तरूणाने जुईनगर स्थानकात आत्महत्या केल्याचे समोर आले होते. हा तरूण वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरूंगलेच होता. वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिच्यासोबत असलेल्या एकमेव साक्षीदाराच्या मृत्यूमुळे या प्रकरणाचा उलगडा करायचा कसा असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता.

मोबाईलमधून उलगडले गूढ

अखेर हा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांनी वैभवचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यात त्यांना मोठा पुरावा मिळाला. त्या मोबाईलमध्ये पोलिसांना एक व्हॉईस नोटही सापडली होती. ज्यामध्ये ‘पिल्लू फक्त दोन मिनिट त्रास होईल, त्यानंतर आपण दुसऱ्या जन्मात प्रवेश करू’, अशी तिची समजूत काढताना दिसला आहे. दोघांचे लग्न होणार नसल्याने ती माझी नाही झाली तर कोणाचीही होणार नाही. या भावनेतून वैभवने हत्येचा कट रचल्याचे समोर आले होते.

मृतदेह कसा शोधला ?

वैभवनेच वैष्णवीची हत्या केल्याचे उघड झाले तरी तिचा मृतदेह मिळाला नव्हता. तो कसा शोधायचा हा प्रश्नही लोकांसमोर होता. तो पुरावा पोलिसांना वैभवच्या मोबाईलमध्ए मिळाला. त्याच्या मोबाईलमध्ये एक नोट होती, ज्यामध्ये ‘L01-501’ हा कोड होता. पोलीस बरेच दिवस या कोडचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र हा कोड कुठला आहे याचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळी म्हणजेच त्या टेकडीवर जाऊन तब्बल 4 दिवस शोधही घेतला, पण त्यांच्या हाती काही लागले नाही.

अखेर त्यांची नजर त्या टेकडीवरील झाडांवर पडली, त्यावर जनगनेसाठी क्रमामक लिहीलेले होते. पोलिसांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ‘L01-501’ हा क्रमांक लिहीलेल झाड शोधून काढले आणि ते तेथे पोहोचले. त्या झाडाजवळच कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. त्या तरूणीचा ड्रेस, घड्याळ यावरून तिची ओळख पटवण्यात आली आणि ती मृत तरूणी वैष्णवीच असल्याचे समोर आले.