धक्कादायकः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे रेल्वे कर्मचाऱ्याची सचखंड एक्स्प्रेसखाली आत्महत्या; 16 जणांवर गुन्हा दाखल

| Updated on: Oct 13, 2021 | 1:42 PM

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून रेल्वेत किमॅन म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने धावत्या सचखंड एक्स्प्रेससमोर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

धक्कादायकः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे रेल्वे कर्मचाऱ्याची सचखंड एक्स्प्रेसखाली आत्महत्या; 16 जणांवर गुन्हा दाखल
भाऊसाहेब गायकवाड
Follow us on

नाशिकः वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून रेल्वेत किमॅन म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने धावत्या सचखंड एक्स्प्रेससमोर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब गायकवाड असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या प्रकरणी अधिकाऱ्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा हादरवून सोडणाऱ्या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसाहेब विठ्ठल गायकवाड हे रेल्वेत किमॅन म्हणून नोकरी करायचे. ते येवला तालुक्यातल्या गारखेडचे रहिवासी होते. त्यांनी सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता तळवाडे शिवारात नगरसोल आणि तारूर रेल्वे स्थानकादरम्यान सचखंड एक्स्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहाजवळ काही चिठ्ठ्या सापडल्या होत्या. त्यामध्ये रेल्वे प्रशासनातील 16 अधिकारी-कर्मचारी आपल्याला त्रास देत असल्याचे लिहिले होते. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्रास आपल्याला असह्य झाला आहे. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेखही होता. या चिठ्ठ्यांच्या आधारे रेल्वे कर्मचारी गायकवाड यांची मुलगी मंगल गायकवाड यांनी येवला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी रेल्वे अधिकारी कैलासदास, बिनोद शर्मा, काळूराम मिणा, गुंजाळ बाबुजी, नवलकिशोर मिणा, आशिष सोनवणे, जयप्रकाश बोधक, मुसा सय्यद, भीमा दिवे, शैलजा, राजू मोकळे, राजू नामदेव, संतोष मेट, फुलसिंग प्रजापती, किशोर आचेया आणि सुनील सूर्यभाव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

हेल्पलाइन सुरू करावी

रेल्वेत अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ करत असल्याचे प्रकार घडत आहेत. फक्त नोकरी आणि प्रमोशनमुळे अनेक कर्मचारी याची कुठेही वाच्यता करत नाहीत. मात्र, त्रासाचा कडेलोट झाल्यामुळे साध्या किमॅन पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्याने चक्क नावासह पत्र लिहून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास यात अनेक कर्मचारी आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडतीलही. मात्र, अशी व्यवस्था मोडून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वतःहून पाऊल उचलावे. अशा छळाविरोधात तक्रार करण्यासाठी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष विभाग किंवा हेल्पलाइन सुरू करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून पुढे येत आहे.

 इतर बातम्याः

500 रुपयांच्या 291 बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न; नाशिकच्या हायप्रोफाइल टोळीत चक्क महिला डॉक्टर!

कोर्टाच्या आवारात पोलिसांना धक्काबुक्की, वकिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; नाशिकमध्ये पार्किंगच्या जागेवरून घातली हुज्जत

बनावट दारूचा दुसरा कारखाना उद्धवस्त; नाशिकमध्ये एकूण दीड कोटीचा ऐवज जप्त, सूत्रधार राजकीय पक्षाचा पदाधिकारी