दिवाळीची रोषणाई करताना विजेचा धक्का, पतीचा मृत्यू, वाचवायला गेलेली पत्नी-मुलंही जखमी

| Updated on: Oct 31, 2021 | 9:58 AM

घरावर लाईटच्या माळा लावत असताना सुनील पवार यांना विजेचा धक्का बसला. हे पाहून कुटुंबीयही धास्तावले. पतीला सोडवण्यासाठी त्यांची पत्नी आणि दोन मुलेही धावत गेली. मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला

दिवाळीची रोषणाई करताना विजेचा धक्का, पतीचा मृत्यू, वाचवायला गेलेली पत्नी-मुलंही जखमी
विजेचा धक्का लागून मृत्यू झालेले सुनील तुकाराम पवार
Follow us on

सातारा : घरावर रोषणाई करताना विजेचा धक्का लागून एका व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या पत्नीसह दोन मुलांनाही इलेक्ट्रिकचा शॉक लागला. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सातारा जिल्ह्यात हा प्रकार घडला. मात्र ही घटना नेमकी कशी घडली, कोणाच्या हलगर्जीमुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

विद्युत रोषणाई करताना शॉक

सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या सुनील तुकाराम पवार यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. सोमवारपासून दिवाळी सुरु होत आहे. त्यामुळे पवार कुटुंबातही उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. दिवाळीच्या निमित्ताने सुनील पवार हे घरावर विद्युत रोषणाई करत होते. यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

पत्नी-मुलंही जखमी

घरावर लाईटच्या माळा लावत असताना सुनील पवार यांना विजेचा धक्का बसला. हे पाहून कुटुंबीयही धास्तावले. पतीला सोडवण्यासाठी त्यांची पत्नी आणि दोन मुलेही धावत गेली. मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत पतीचा मृत्यू झाला. तर त्यांच्या बचावासाठी आलेले कुटुंबातील इतर तिघे जणही जखमी झाले.

सातारा शहरातील मोरे कॉलनी भागात ही दुर्दैवी घटना घडली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मात्र या दुर्घटनेमुळे कुटुंबात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. या दुर्दैवी अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या निमित्ताने विद्युत रोषणाई करताना काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

अहमदनगरमध्ये बॉडीबिल्डरचा शॉक लागून मृत्यू

याआधी, 2019 मध्ये ‘मिस्टर इंडिया’चा किताब पटकवणारा अहमदनगरचा युवा शरीरसौष्ठवपटू अजिंक्य गायकवाड याचा मृत्यू झाला. महावितरण आणि केबल ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप गायकवाड कुटुंबाने केला होता. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घरात असलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने शॉक बसून सप्टेंबर महिन्यात 30 वर्षीय अजिंक्य गायकवाड याचा मृत्यू झाला होता. ग्रिलला चारही बोटं चिकटल्यामुळे तो ऑन द स्पॉट गेल्याचं वडिलांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

ग्रिलला चारही बोटं चिकटली, आणि तो ऑन द स्पॉट गेला, Mr India अजिंक्य गायकवाडच्या वडिलांनी सांगितला मृत्यूचा घटनाक्रम

घरात एकटी असताना विजेचा धक्का, बुलडाण्यात 20 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

सफाई करताना कुलरला चिकटला, वडिलांनाही विजेचा धक्का, वर्ध्यात तरुणाचा मृत्यू