
सध्या सोशल मीडियामुळे जगभरातील लोक एकमेकांच्या जवळ आले आहेत. आपण घरबसल्या जगातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतच्या माणसासोबत गप्पा मारु शकतो. यामुळे सातासमुद्रापार मैत्रीचे प्रमाण वाढत आहे. काही वेळा या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होते आणि एकमेकांबद्दलची ओढ वाढत जाते. यानंतर मग नकळतपणे मर्यादा ओलांडल्या जातात आणि मग अचानक वास्तव समोर येते आणि आपली अनेक स्वप्न धुळीस मिळतात. अशाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका तरुणीसोबत झाला आहे.
उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील मेरठमध्ये राहणाऱ्या एका तरुणीची बागपतच्या रतौल येथील एका व्यक्तीशी सोशल मीडियावर ओळख झाली. त्या दोघांची मैत्री इंस्टाग्रामद्वारे मैत्री झाली. ते दोघेही एकमेकांशी बोलू लागले आणि बघता बघता या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ते दोघेजण चार वर्षे एकमेकांशी हसून-खेळून गप्पा मारत होते. ती तरुणी त्या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. यामुळेच तिने त्याला भेटण्याचा प्लॅन आखला.
त्या तरुणाने संभाषणादरम्यान एकदा तिला घराचा पत्ता सांगितला होता. त्यावेळी त्याला असं वाटलं होतं की त्याला न सांगता कधीही येणार नाही. पण एके दिवशी त्या तरुणीने कोणालाही न सांगता त्याला भेटण्याचा प्लॅन आखला आणि ती त्याच्या घरी पोहोचली. मात्र, तिथे पोहोचताच तिला मोठा धक्का बसला. तिला समजले की ज्या व्यक्तीवर तिने प्रेम केले, तो विवाहित आहे आणि त्याला आठ मुले आहेत. हे सत्य ऐकल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
या घडलेल्या प्रकारामुळे ती गोंधळली होती. तिला काय करावे काहीही समजत नव्हते. शेवटी रडत रडत तिने पोलीस ठाणे गाठले. तिने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तिचे त्या मुलावर जीवापाड प्रेम असल्याचेही तिने सांगितले. यानंतर रटौल पोलीस चौकीचे प्रभारी संजय सिंह यांनी त्या तरुणीला शांत केले. तिला समजवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिची समजूत काढल्यानंतर अखेर ती घरी परतली. मात्र यामुळे सोशल मीडियावर खरं काय आणि खोटं काय हे कसं ओळखायचं? हे समजणं मात्र दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे.