Wardha : लग्नात गेलेल्या बापाने स्वत:च्या मुलाचं केलं अपहरण, तक्रार दाखल झाल्यानंतर…

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून मुलाला ताब्यात घेतल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण लग्नात आलेलं मुल गायब झाल्याने मुलाची आई अधिक चिंताग्रस्त आहे.

Wardha : लग्नात गेलेल्या बापाने स्वत:च्या मुलाचं केलं अपहरण, तक्रार दाखल झाल्यानंतर...
gondia police station
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 18, 2023 | 9:08 AM

शाहिद पठाण, वर्धा : लग्नात गेल्यानंतर संधी मिळताच सासरच्या लोकांनी आपल्या मुलाचं अपहरण केल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये (Gondia Police) दाखल झाली आहे. त्यामुळे पोलिस सुध्दा चांगलेचं सतर्क झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून चौकशी सुरु केली आहे. रजनी धीरज गौतम (rajani dhiraj goutam) असं तक्रारदार महिलेचं नाव असून त्या पतीपासून विभक्त राहत आहेत. मुलाच्या वडिलाने मुलाला फुस लावून पळविले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात पती पत्नी विभक्त (Husband and wife separated) झाल्याची माहिती मिळाली आहे.

वर्धा येथे अपहरण करून नेल्याची तक्रार

नातेवाइकांच्या लग्नात आलेल्या नवऱ्याने आपल्या मुलाला आमिष देऊन त्याला वर्धा येथे अपहरण करून नेल्याची तक्रार रजनी धीरज गौतम (24, रा. इतवारी बाजार, शितला माता मंदिराजवळ वर्धा, ह.मु. झोपडी मोहल्ला, यादव चौक, गोंदिया) यांनी केली आहे. धीरज श्याम गौतम (29, रा. ईतवारा बाजार, शितला माता मंदिराजवळ, वर्धा) यांच्यासोबत रजनीचे रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते.

मुलाचा फुस लावून पळवून नेल्याचा आरोप

लग्न झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत ते दोघेही सखाने संसार करीत होते. नंतर दारू पिऊन धीरज क्षुल्लक कारणांवरून भांडण करायचा. त्याचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याने त्या पती-पत्नीमध्ये भांडणे व्हायची. अखेर या त्रासाला कंटाळून पत्नी मुलाला घेऊन 2020 ला माहेरी निघून गेली. 16 फेब्रुवारी रोजी तिच्या मामाचे लग्न असल्याने त्या लग्नाला मडी लॉन येथे नवरा धीरज श्याम गौतम, सासु दीपा श्याम गौतम (50) व नणंद काजल रामप्रसाद तिवारी (35) (तिघे रा. इतवारा बाजार, शितला माता मंदिराजवळ, वर्धा) हे आले होते. दरम्यान 5 वर्षांच्या मुलाला त्या तिघांनी अपहरण करून नेल्याची तक्रार करण्यात आली. तिघांवर भादंविच्या कलम 363, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस घेत आहेत मुलाचा शोध

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून मुलाला ताब्यात घेतल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण लग्नात आलेलं मुल गायब झाल्याने मुलाची आई अधिक चिंताग्रस्त आहे. त्यामुळे आईने मुलाचे वडील, नणंद आणि सासू विरोधात तक्रार दाखल केली आहे.