BMC Schools : चला…’आरोग्यम् धनसंपदा विद्यार्थ्यांनासुद्धा लागू होतं’ , BMC च्या शाळांनी लक्षात आणून दिलं !

| Updated on: May 11, 2022 | 7:53 PM

मानसिक आरोग्य ठीक नसल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो. मुळातच दंत, मानसिक आणि मधुमेह या तीनही मुद्यांमुळे शिक्षणात अडथळा येऊ शकतो. आता या सर्व बाबी लक्षात घेऊन महानगपालिकेच्या शाळांमध्ये तशा पद्धतीचं अभियान राबवलं जाणार आहे.

BMC Schools : चला...आरोग्यम् धनसंपदा विद्यार्थ्यांनासुद्धा लागू होतं , BMC च्या शाळांनी लक्षात आणून दिलं !
पहिल्यांदाच शिवसेनेच्या जनसागरासमोर आदित्य ठाकरे
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

मुंबई : आरोग्य हीच खरी संपत्ती (Health Is Wealth) आहे मग ती संपत्ती लहानपणापासूनच का जपू नये ? हा विचार करूनच डेंटल, मेंटल (Mental)आणि डायबिटीज या तीनही आरोग्य मुद्द्यांवर महानगरपालिकेच्या शाळांमधून आता काम केलं जाणार आहे. कोविड कालावधीमध्ये राज्यभरात ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून केलेल्या सर्वेक्षणातून सुमारे 16 टक्के नागरिकांना रक्तशर्करा संबंधित आरोग्य समस्या असल्याची बाब समोर आली. इतकंच काय तर दंतविकारामुळे बालकांमध्ये कुपोषणाची समस्या निर्माण होते. मानसिक आरोग्य ठीक नसल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो. मुळातच दंत, मानसिक आणि मधुमेह या तीनही मुद्यांमुळे शिक्षणात अडथळा येऊ शकतो. आता या सर्व बाबी लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तशा पद्धतीचं अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानाचं नाव आहे ‘सुरक्षित शाळा प्रवेश अभियान’ (Safe Access to Schools) अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

शाळेमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची डेंटल, मेंटल आणि डायबिटीज अर्थात दंत, मानसिक आणि मधुमेह या 3 आरोग्य पैलूंच्या दृष्टीकोनातून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हे लक्षात घेता, या तिनही आरोग्य मुद्यांवर विद्यार्थ्यांची काळजी देखील महानगरपालिकेच्या शाळांमधून घेतली जात आहे, त्यासाठीच सुरक्षित शाळा प्रवेश अभियान राबवित असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितलंय.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ हा उपक्रम सुरु केला आहे. त्याचा शुभारंभ सह्याद्री राज्य अतिथीगृहात मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्यासह राज्याचे नगरविकास मंत्री श्री. एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (11 मे 2022) करण्यात आला. यावेळी खासदार श्री. अरविंद सावंत, मुंबईच्या माजी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, सह आयुक्त (शिक्षण) श्री. अजीत कुंभार तसेच सर्व परिमंडळीय उप आयुक्त, सहायक आयुक्त श्री. किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ, श्री. राजू तडवी तसेच शिक्षण खात्यातील इतर अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

‘राईट टू क्वॉलिटी एज्युकेशन’ ध्येय नजरेसमोर ठेवून जाणीवपूर्वक चांगले बदल

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागते आहे, हे आज दिसणारे चित्र मागील 10 वर्षातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण अर्थात राईट टू क्वॉलिटी एज्युकेशन हे ध्येय नजरेसमोर ठेवून त्यासाठी जाणीवपूर्वक चांगले बदल घडविण्यात आले. त्याही पुढे जाऊन आता सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निश्चिंतपणे शाळेत येता यावे, यासाठी ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ (Safe Access to Schools) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे अभियान शालेय शिक्षण विभाग आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. शिक्षणासोबत सुरक्षितता आणि गुणवत्ता यांचा मेळ साधणे आवश्यक असल्याचे नमूद करुन पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रत्येक शाळेच्या 500 मीटर परिघामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बसथांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा इत्यादी सर्व आवश्यक असतात.