दिंडोरीत आघाडीत बिघाडी?, जयंत पाटील आले आणि… दिवसभरात काय घडलं?
नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे.
नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने उमेदवारही जाहीर केलाय. मात्र माकपने ही जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे. माकपच्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाशिकला आले. मात्र जयंत पाटलांचा प्रस्ताव देखील माकपने फेटाळल्याने नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर दावा करत ही जागा माकपला सोडण्याचा आग्रह धरला. इतकच नाही तर उमेदवारी दिली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत माकप आपला उमेदवार देईल, असा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट नाशिक गाठलं आणि माकपचे इच्छुक उमेदवार कॉम्रेड जेपी गावित यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.
आघाडी धर्म आम्हीच पाळायचा का?
जयंत पाटील आणि माकपचे इच्छुक उमेदवार माजी आमदार जेपी गावित, माकपचे राज्याचे उपाध्यक्ष डॉ. डीएल कराड यांच्यात बंददाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाली. मात्र जयंत पाटील यांनी दिलेला प्रस्ताव कॉम्रेड जेपी गावित यांनी फेटाळून लावला. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीचा धर्म आम्हीच पाळायचा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या मतदारसंघात आमची ताकद असताना आम्हाला उमेदवारी न दिल्याने आम्ही माकपच्या विळा-हातोडा-तारा या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं निक्षून सांगितलं.
दोन लाख मतदार
नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. कांद्याच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक असल्याने ही जागा महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता वर्तवली जात असताना महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास भाजपाच्या भारती पवारांना या जागेवर विजय मिळवण सोप होईल. कारण या मतदारसंघात माकपचे तब्बल 2 लाख मतदार आहेत. त्यामुळे ही मोठी ताकद जर विभागली गेली तर महाविकास आघाडीचा उमेदवाराला दिंडोरीतून मोठा फटका बसेल आणि याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल. त्यामुळे आता नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीतील नेते काय मार्ग काढणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.