महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना कर्नाटकात मौन धारण करण्याची वेळ, पाहा काय कारण?

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना कर्नाटकात मौन धारण करण्याची वेळ आली आहे. कारण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने याबाबतचे थेट आदेशच दिले आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देता येणार नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना कर्नाटकात मौन धारण करण्याची वेळ, पाहा काय कारण?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 19, 2023 | 6:07 PM

बंगळुरु : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) पार्श्वभीमवर प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार आहे. तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर आपले उमेदवार निवडून यावे, यासाठी भाजपने कंबर कसली आहे. विशेष म्हणजे यासाठी भाजपने प्रत्येक राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज कर्नाटकात प्रचारासाठी कामाला लावली आहे. या फौजेत महाराष्ट्राचे देखील सहा दिग्गज नेते आहेत. असं असलं तरीही भाजपच्या गोटातून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या सीमावादाशी स्थानिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांना महाराष्ट्रात यायचं आहे. पण ते कागदोपत्री कर्नाटक राज्याच्या हद्दीत राहतात. या मुद्द्यावरुन कित्येक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. पण तरीही हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापुरातील अनेक गावांवर दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला होता. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकारणी या मुद्द्यावरुन एकमेकांवर निशाणा साधत होते.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना माध्यमांशी बोलण्यात मज्जाव

या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिल्लीला बोलावून याबाबतचा वाद मिटवला होता. संबंधित प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असेपर्यंत कुणीही या विषयी वाद घालणार नाही, असं अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत ठरलं होतं. असं असलं तरीही वारंवार सीमावादावरुन राजकारण तापताना दिसतं. आता याच राजकारणाच्या मुद्द्यावरुन कर्नाटकात महाराष्ट्रातून गेलेल्या भाजप नेत्यांना थेट प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

केंद्रीय नेतृत्वाचे आदेश

महाराष्ट्रातील नेत्यांनी माध्यमांशी बोलू नका. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा परिणाम कर्नाटक निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कर्नाटकात पक्षाचं काम करा. स्थानिक नेते माध्यमांसमोर बाजू मांडतील, अशी सावध भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच सूचना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठीला’ दिली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठी स्टार प्रचारक नेत्यांची यादील जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. भाजपने महाराष्ट्रातील सहा जणांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर आणि प्रसाद लाड या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांकडून कर्नाटकात पक्षासाठी काम केलं जात आहे.

Follow Us