अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत? नवनीत राणा यांची बच्चू कडू यांना विनंती

| Updated on: Mar 29, 2024 | 10:09 PM

अमरावती लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना ही निवडणूक सोपी जाणार नाहीये. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. दुसरीकडे अभिजीत अडसूळ यांनी देखील महायुतीत बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत? नवनीत राणा यांची बच्चू कडू यांना विनंती
Follow us on

नवनीत राणांमुळे सतत चर्तेत राहणाऱ्या अमरावती मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रहारकडून राणांविरोधात दिनेश बूब यांना अमरावतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकांच्या हितासाठी निवडणूक लढणार आणि जिंकणार असा निर्धार दिनेश बूब यांनी केला आहे. तर अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अशी विनंती नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना केली आहे. दरम्यान प्रहार संघटनेनं अमरावतीतून उमेदवारी दिलेले दिनेश बूब कोण आहेत ते जाणून घेऊयात.

कोण आहेत दिनेश बूब?

ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांनी प्रहार संघटनेत प्रवेश केला आहे. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर दिनेश बूब यांचा दर्यापूरमधून पराभव झाला होता. दिनेश बूब यांचं सामाजिक क्षेत्रात मोठं काम आहे. सर्वच पक्षात दिनेश बूब यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. अमरावती शहरातील हिंदी भाषिक मतांवर मोठा प्रभाव आहे.

दरम्यान वेळ पडल्यास महायुतीतून बाहेर पडू मात्र, उमेदवार मागे घेणार नसल्याचं थेट आव्हान बच्चू कडू यांनी दिलं आहे. तर बच्चू कडूंनी दिलेल्या आव्हानानंतर नितेश राणेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद सागर बंगल्यावर आहे असं नितेश राणे यांनी म्हटले होते. त्यावर बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बच्चू कडूंचा राजकारणात कोणी बाप नाही, राणेंचा असू शकतो.

प्रहार संघटनेनं उमेदवार दिल्यानंतर या अमरावतीत चौरंगी लढत होणार आहे. नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. तर काँग्रेसकडून बळवंत वानखेडेंना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. आनंदराव अडसुळांचे पुत्र अभिजीत अडसूळ देखील अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. तर प्रहारनंही राणांविरोधात दिनेश बूब यांना उमेदवारी दिली आहे.

अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम

अमरावतीत यंदा चौरंगी लढत होणार असली तरी 2019 मध्ये कोणाचं पारडं जड होतं. 2019 च्या निकालाचे आकडे काय होते.

2019 अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष नवनीत राणा विरूद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ मैदानात होते.

नवनीत राणांना 5 लाख 7 हजार 844 मतं मिळाली होती. तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 70 हजार 549 मतं मिळाली होती. जवळपास 37 हजार 295 मतांच्या फरकानं नवनीत राणा विजयी झाल्या होत्या.

नवनीत राणा भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्या तरी त्यांना ही निवडणूक सोप्पी जाणार नाहीये. अमरावतीतून अभिजीत अडसूळ अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. काँग्रेसला या मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद मिळणार आहे. तर प्रहारनंही उमेदवार दिल्यानंतर या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.