Election Result 2022 Live: आधीच्या सरकारकडून फक्त घोषणा व्हायच्या, पण निर्णय नाही; मोदींचा काँग्रेसवर नाव न घेता हल्ला

| Updated on: Mar 10, 2022 | 8:18 PM

पूर्वी जनता आपल्या हक्कासाठी सरकारचे दरवाजे ठोठावत होती. वीजेपासून टेलिफोनपर्यंत सामान्य गरजांसाठी जनतेला सरकारी कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत होत्या. पैसे द्यावे लागत होते. काही लोकांना सुविधा मिळत होते.

Election Result 2022 Live: आधीच्या सरकारकडून फक्त घोषणा व्हायच्या, पण निर्णय नाही; मोदींचा काँग्रेसवर नाव न घेता हल्ला
आधीच्या सरकारकडून फक्त घोषणा व्हायच्या, पण निर्णय नाही; मोदींचा काँग्रेसवर नाव न घेता हल्ला
Image Credit source: bjp twitter
Follow us on

नवी दिल्ली: पूर्वी जनता आपल्या हक्कासाठी सरकारचे दरवाजे ठोठावत होती. वीजेपासून टेलिफोनपर्यंत सामान्य गरजांसाठी जनतेला सरकारी कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत होत्या. पैसे द्यावे लागत होते. काही लोकांना सुविधा मिळत होते. देशात गरीबाच्या नावाने घोषणा खूप झाल्या. योजना बऱ्याच झाल्या. पण योजनांचे जे हक्कदार होते. ज्यांचा हक्क होता. त्यांना मिळायला हवा होता, कोणत्याही त्रासाशिवाय मिळायला हवा होता, पण त्यांना मिळत नसायचा. घोषणा व्हायच्या, पण निर्णय होत नव्हता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी केली. मोदी यांनी काँग्रेसचं नाव न घेता काँग्रेसवर (congress) जोरदार हल्ला चढवला. सुशासन, डिलिव्हरीचं महत्त्व असतं. भाजप (bjp) ही गोष्ट जाणून आहे… मी अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे शेवटच्या माणसासाठी किती काम केलं पाहिजे हे मला माहीत आहे, असंही मोदींनी सांगितलं. उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपला विजय मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी हा हल्ला चढवला.

आज उत्साहाचा दिवस आहे. उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव भारताच्या लोकशाहीचा आहे. या निवडणुकीत भाग घेणाऱ्या सर्व मतदारांचे खूप खूप अभिनंदन. आम्हाला पुन्हा सत्ता देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी मतदारांचे आभार मानतो. विशेष करून माता भगिनींनी, तरुणांनी ज्या प्रकारे भाजपला भरपूर पाठिंबा दिला, तो एक मोठा संदेश आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांनी मतदानात उत्साहाने भाग घेऊन भाजपचा विजय निश्चित केला, त्यांचे मला समाधान आहे. होळी 10 मार्चपासूनच सुरू होणार असल्याचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं होतं. आपल्या कर्मठ कार्यकर्त्यांनीही विजयी ध्वज फडकवला आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं कौतुकही करतो. त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली. कार्यकर्त्यांनी जनता जनार्दनांचं मन जिंकण्यास, त्यांचा विश्वास जिंकण्यास यशस्वी ठरले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

विजयाचा चौकार मारला

पक्षाच्या सर्व छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमातून एनडीएसाठी विजयाचा चौका मारला आहे. उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले. परंतु, पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्र्याला पुन्हा निवडून देण्याचं हे पहिलं उदाहरण आहे, असंही ते म्हणाले.

मतांच्या टक्केवारीत वाढ

उत्तर प्रदेशात 37 वर्षानंतर एखादं सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलं आहे. तीन राज्य यूपी, गोवा, मणिपूरमध्ये सत्तेत असूनही भाजपच्या व्होटिंग टक्केवारीत वाढ झाली आहे. गोव्यात सर्व एक्झिट पोल चुकीचे निघाले. जनतेने तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली. दहा वर्ष सत्तेत राहूनही राज्यात भाजपच्या जागेत वाढ झाली. उत्तराखंडमध्येही भाजपने नवा इतिहास रचला आहे. राज्यात पहिल्यांदा एखादा पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आला आहे. या राज्यांची आव्हाने वेगवेगळे आहेत. विकासाचे मार्ग वेगळे आहेत. पण भाजपावर विश्वास हे सूत्र या राज्यांचं समान आहे. भाजपची नीती आणि नियत आणि भाजपच्या निर्णयावर आपार विश्वास. हे निकाल भाजपच्या प्रोपुअर, प्रो अॅक्टिव्ह गव्हर्न्सवर एक मजबूत शिक्कामोर्तब आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

PM Modi Address Live : मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदी लाईव्ह, भाजपची जोरदार घोषणाबाजी

Punjab Election results 2022 : शरद पवारांच्या घरी काम करणाऱ्यांची मतं “आप”ला, असं का घडलं?

Uttar Pradesh Election Result 2022 : ‘उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला’, योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया