Tamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : AIDMK ला DMK चा धोबीपछाड, तामिळनाडूत सत्तापरिवर्तन निश्चित?

| Updated on: Apr 29, 2021 | 7:24 PM

Tamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Tamil Nadu 2021) तामिळनाडूमध्ये सत्तापरिवर्तन होण्याचा अंदाज आहे.

Tamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : AIDMK ला DMK चा धोबीपछाड, तामिळनाडूत सत्तापरिवर्तन निश्चित?
Tamil Nadu Elections Exit Poll Results 2021
Follow us on

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल येत्या 2 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र, निकाल जाहीर होण्याआधी एक्झिट पोलची आकडेवारी आता समोर आली आहे. या आकडेवारीनुसार तामिळनाडूत सत्तापरिवर्तन होण्याचा अंदाज आहे. सत्ताधारी AIDMK ला विरोधी पक्ष द्रमुक अर्थात DMK कडून मोठा धोबीपछाड मिळण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूत 6 एप्रिलला विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 71.79 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत जवळपास 4 हजार उमेदवारांनी आपलं नशिब आजमावलं आहे.

माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांची उणीव, सुपरस्टार रजनीकात यांची राजकारणातील माघार, अभिनेते कमल हसन आणि शशिकला यांची राजकारणातील एन्ट्री तसेच भाजपची एआयएडीएमके सोबत झालेली युती या पार्श्वभूमीवर तामिळनाडूची निवडणूक अत्यंत रंगदार झाली. या निवडणुकीनंतर आता तामिळनाडूमध्ये सत्तापरिवर्तन होण्याचा अंदाज आहे.

एक्झिट पोलचा नेमका अंदाज काय?

टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Tamil Nadu 2021) तामिळनाडूमध्ये सत्तापरिवर्तन होण्याचा अंदाज आहे. सत्ताधारी AIDMK ला विरोधी पक्ष द्रमुक अर्थात DMK ने मोठा झटका दिल्याचं चित्र आहे. कारण सत्ताधारी AIDMK ला केवळ 75 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर DMK ने मोठी मजल मारत 143 ते 153 जागा काबिज करण्याचा अंदाज आहे.

तामिळनाडूत एक्झिट पोलनुसार कुणाला किती जागा?

डीएमके (DMK) – 143 ते 153
एआयडीएमके (AIDMK) – 75 ते 85
अन्य – 02 ते 12
एकूण – 234

तामिळनाडूत सध्या कुणाकडे किती जागा?

तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. राज्यात एआयडीएमकेची सत्ता आहे. पलानीस्वामी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत एमआयएडीएमकेच्या आघाडीने 134 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी डीएमके दुसऱ्या क्रमांकावर गेली होती. डीएमकेला 98 जागा मिळाल्या होत्या. डीएमकेसोबत काँग्रेस आणि छोटे राजकीय पक्ष होते. तर पीएमकेला एका जागावर विजय मिळाला होता. तामिळनाडूत सत्ता बनविण्यासाठी 118चा जादूई आकडा गाठावा लागतो. तामिळनाडूत भाजपचं अस्तित्व नाही. परंतु, भाजपने एआयएडीएमकेसोबत युती करून राज्यात चंचूप्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसभेची पुनरावृत्ती होणार

करुनानिधी यांच्या निधनानंतर डीएमकेची सर्व धुरा स्टालिन यांच्याकडे आली आहे. स्टालिन हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2019च्या निवडणुकीत आक्रमक प्रचार करत 39 पैकी 37 जागांवर उमेदवार निवडून आणले आहेत. तर सत्ताधारी एआयएडीएमकेला केवळ एकच खासदार निवडून आणता आला आहे. या उलट 2014च्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने 37 जागा जिंकल्या होत्या. तर भाजप आणि पीएमकेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली होती. मात्र 2019च्या निवडणुकीत स्टालिन यांनी संपूर्ण चित्रं बदललं होतं. त्यामुळे स्टालिन विधानसभा निवडणुकीतही हीच कामगिरी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कमल हसन फॅक्टर

अभिनेते कमल हसन यांनी 2018 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणात अधिकृतपणे एन्ट्री केली. त्यांनी ‘मक्कल नीधि मय्यम’ (MNM) नावाचा पक्ष स्थापन केला. मात्र त्यांनी अद्याप निवडणुका लढवलेल्या नाहीत. मात्र, कमल हसन हे डाव्या विचारांचे आहेत. त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना तामिळनाडूत किती यश मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे सुपरस्टार रजनीकांत यांनी आजाराचं कारण दाखवून राजकारणातून माघार घेतली. रजनीकांत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे रजनीकांत यांनी तामिळनाडूचं राजकारण बदललं असतं. परंतु, त्यांनी माघार घेतल्याने त्याचा फायदा कमल हसन यांना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती.

विजयकांत यांचा चमत्कार

या शिवाय अभिनेते, निर्माते विजयकांत यांच्यापक्षाकडेही डोळेझाक करून चालणार नाही. विजयकांत यांनी देसीय मुरपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) नावाचा पक्ष स्थापन केला आहे. 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 29 जागा जिंकल्या आहेत. सध्या ते त्यांच्या पक्षाचे महासचिव आणि आमदार आहेत. त्यामुळे या निडणुकीत त्यांच्याशी करिश्म्यावर अनेकांचं लक्ष होतं.

भाजपला आशा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएडीएमकेसोबत युती करण्यात भाजप यशस्वी यश आलं होतं. भाजपने तामिळनाडूत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर भर दिला होता. तामिळनाडूत आपण सत्तेत येणार नाही हे भाजपलाही माहीत आहे. परंतु दोन अंकी आकडा गाठण्यावर भाजपचा भर होता. सत्ताधारी पक्षासोबत राहून सत्तेत आल्यास त्याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता भाजपला किती जागा मिळणार आणि त्यावर भाजप काय प्लानिंग करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, अभिनत्री खुशबू सुंदर वगळता भाजपकडे अद्यापही तामिळनाडूत बडा नेता नसल्याने भाजपची अडचण झाली होती.

संबंधित बातम्या :

पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता, एक्झिट पोलच्या आकड्यांकडे देशाचं लक्ष