Aamir Khan |मनाच्या शांतीसाठी आमिर खान पोहोचला ‘या’ देशात; 11 दिवस करणार ध्यानसाधना

आमिरच्या खासगी आयुष्यातही बरेच चढउतार पहायला मिळाले. आमिरने किरण रावशी घटस्फोट जाहीर केला. तर 'दंगल'मधील सहअभिनेत्री फातिमा सना शेखसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Aamir Khan |मनाच्या शांतीसाठी आमिर खान पोहोचला या देशात; 11 दिवस करणार ध्यानसाधना
Aamir Khan
Image Credit source: Twitter
| Updated on: May 08, 2023 | 8:11 AM

काठमांडू : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानचा गेल्या वर्षी ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने मोठा निर्णय घेतला. काही काळ अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचं त्याने जाहीर केलं होतं. यानंतर तो आधी काही दिवस अमेरिकेला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला. अमेरिकेतून परत आल्यानंतर त्याने कुटुंबीयांना वेळ दिला. यादरम्यान आमिरच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. आता या ब्रेकदरम्यान आमिर त्याच्या मनाच्या शांतीसाठी नेपाळला ध्यानसाधना करण्यासाठी गेला आहे. रविवारी आमिर काठमांडू विमानतळावर पोहोचला आणि तिथून तो ध्यान शिबिरासाठी रवाना झाला.

आमिर खान हा नेपाळमधील बुधनिलकंठ याठिकाणी विपश्यना केंद्रात जवळपास 11 दिवस ध्यानसाधना करणार आहे. काठमांडूच्या बाहेरील प्रदेशात असलेली ही जागा लोकप्रिय ध्यान केंद्र आहे. याठिकाणी येणाऱ्यांना किमान दहा दिवसांचा कोर्स करावा लागतो. या दहा दिवसांत त्यांचा बाहेरील जगाशी कोणताच संपर्क येत नाही. मन शांत करण्यासाठी त्यांना ध्यानसाधना शिकवली जाते.

लगान, थ्री इडियट्स, पीके, दिल चाहता है, रंग दे बसंती यांसारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणाऱ्या आमिरचे गेल्या पाच वर्षांतील दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. ठग्स ऑफ हिंदोस्तान आणि लाल सिंग चड्ढा या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीत. यादरम्यान आमिरच्या खासगी आयुष्यातही बरेच चढउतार पहायला मिळाले. आमिरने किरण रावशी घटस्फोट जाहीर केला. तर ‘दंगल’मधील सहअभिनेत्री फातिमा सना शेखसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.

आमिरचा मोठा निर्णय

आमिर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. जवळपास 18 महिने तो रुपेरी पडद्यापासून लांब राहणार आहे. आमिरचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. मात्र असा निर्णय घेण्यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घेण्यामागचं कारण काय?

कामातून काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना वेळ देणार असल्याचं आमिरने सांगितलं होतं. “जेव्हा मी अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या कामात मी पूर्णपणे व्यग्र होऊन जातो. माझ्या जीवनात दुसरं काहीच उरत नाही. याच कारणामुळे मी ब्रेक घेतोय. मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायचंय. माझी आई, माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी फक्त कामच करतोय. मी फक्त माझ्या कामाकडेच पूर्ण लक्ष देतोय आणि जे लोक माझ्या जवळचे आहेत, त्यांच्यासाठी ही बाब योग्य नाही”, असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता.