मी जणू माझं बाळच गमावलंय, सर्व चूक आमचीच..; आमिर खानची भावूक कबुली

मुलगा जुनैद खानचा 'एक दिन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर आमिर खानने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जणू मी माझं बाळच गमावलं आहे, अशा शब्दांत आमिरने प्रतिक्रिया दिली आहे. तो नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

मी जणू माझं बाळच गमावलंय, सर्व चूक आमचीच..; आमिर खानची भावूक कबुली
Aamir Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2026 | 9:51 AM

अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातील जुनैदच्या दमदार अभिनयाचंही कौतुक झालं. मात्र त्यानंतर ‘लवयापा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘एक दिन’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले. जवळपास 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘एक दिन’मध्ये जुनैद आणि साई पल्लवीची जोडी दिसली होती. आता हा चित्रपट सुपरफ्लॉप झाल्यानंतर आमिरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कारण या चित्रपटाची निर्मिती आमिरच्याच प्रॉडक्शन कंपनीने केली होती.

‘झी म्युझिक कंपनी’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला की, जेव्हा प्रेक्षक त्याचा एखादा चित्रपट नाकारतात, तेव्हा त्याच्या मनाला ही गोष्ट लागते. कारण तो त्याच्या प्रत्येक चित्रपटाला तो त्याच्या मुलासारखंच सांभाळतो. आमिरने यावेळी स्पष्ट केलं की तो हे सर्व भावनिक स्तरावर बोलत आहे. जेव्हा प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होतो, तेव्हा त्यांच्यासोबत माझ्याही भावना दुखावल्या जातात, असं आमिर पुढे म्हणाला. एखादा चित्रपट फ्लॉप झाला तर त्याचा काय परिणाम होतो, याचाही खुलासा त्याने या मुलाखतीत केला.

“जेव्हा माझा एखादा चित्रपट दणक्यात आपटतो, तेव्हा ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागतो. मी पूर्णपणे खचून जातो. कारण आम्ही तो चित्रपट प्रेक्षकांसाठीच बनवलेला असतो. प्रेक्षक तिकिट खरेदी करून थिएटरमध्ये या अपेक्षेनं येतात की त्यांचं मनोरंजन होईल आणि जर त्यांना तो चित्रपट आवडला नाही, तर याचा थेट अर्थ असा होतो की आमच्या कामात काहीतरी कमतरता राहिली. प्रेक्षक जाणूनबुजून एखाद्या चित्रपटाला वाईट ठरवत नाहीत. जर ते निराश होऊन घरी परतत असतील, तर चूक फक्त आमची आहे”, अशा शब्दांत आमिर व्यक्त झाला.

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर पुढील दोन ते तीन महिन्यांपर्यंत डिप्रेशनमध्ये जात असल्याची कबुली आमिरने यावेळी दिली. “एक सिनेमा हा आपल्या बाळासारखा असतो. जेव्हा तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतो, तेव्हा त्याचं दु:ख सहन करणं खूप कठीण असतं. आपल्या नुकसानीवर आणि अपयशावर दु:ख व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुमचा चित्रपट चालत नाही, तेव्हा ती भावना एखादं बाळ गमावण्यासारखीच असते. त्यामुळे त्यावर रडावंसं वाटलं तर रडावं आणि स्वत:ला थोडा वेळ द्यावा. जेणेकरून तुमच्या मनातून ते दु:ख बाहेर पडेल आणि तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल”, असं आमिर म्हणाला.

Follow Us