त्याला रडताना पाहिलंय..; आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून वाद, लव्ह जिहाद-फतव्यादरम्यान खास मित्राचा खुलासा

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. अनेकांनी त्याच्यावर लव्ह जिहादचा आरोप केला आहे. तर आमिरविरोधात मुफ्तींनी फतवासुद्धा जारी केला आहे. आता आमिरच्या जवळच्या मित्राने त्याच्याविषयी खुलासा केला आहे.

त्याला रडताना पाहिलंय..; आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून वाद, लव्ह जिहाद-फतव्यादरम्यान खास मित्राचा खुलासा
Aamir Khan and Gauri Spratt
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2026 | 9:48 AM

अभिनेता आमिर खानने 5 जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं. वयाच्या 61 व्या वर्षी आमिरने त्याच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. मात्र ही गोष्टी अनेकांना रुचली नाही. आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, तर काही ठिकाणी आंदोलनंसुद्धा झाली. आमिरच्या या लग्नाला काहींनी ‘लव्ह जिहाद’ असं म्हटलंय, तर काहीजण त्याच्याविरोधात फतवा जारी करत आहेत. या सर्व हंगामादरम्यान आता आमिरचा जवळचा मित्र अमीन हाजी याने बरेच खुलासे केले आहेत. ‘रेडिफ’च्या एका मुलाखतीत अमीनने सांगितलं की, तो आमिर खानला गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून ओळखतो.

आमिरच्या मित्राचा खुलासा

“मी आमिरला 15 वर्षांपेक्षा जास्त नाही तर 35 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ओळखतो. मी त्याला कायम लग्नसंस्थेचा आदर करताना पाहिलं आहे. अनेकजण एका अपयशी नात्यानंतर निराशावादी होतात, पण आमिर तशातला नाही. त्याने लग्नसंस्थेकडे कायम आदराने पाहिलं आहे. लोक त्याच्या खासगी आयुष्याची खिल्ली उडवतात, पण तो किती प्रामाणिक आणि निष्पक्ष आहे, हे कोणी पाहत नाही. त्याने अत्यंत जबाबदारीने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना संपूर्ण कुटुंब आणि मुलंसुद्धा ठीक राहतील, याची त्याने विशेष काळजी घेतली आहे. फार कमी लोकांना हे सर्व दिसतं”, असं तो म्हणाला.

“त्याला रडताना पाहिलंय..”

आमिर खान स्वत: अत्यंत भावनिक असल्याचंही अमीनने सांगितलं आहे. याविषयी तो पुढे म्हणाला, “आमिरने या वयात पुन्हा प्रेमात पडून लग्न केलं, अशी मस्करी लोक करतात. पण 15 वर्षांचा काळ हा खूप मोठा असतो. मी त्याचा हृदयभंग होताना पाहिलं आहे, मी त्याला रडताना पाहिलं आहे. नातेसंबंध तितके सरळ नसतात, जितके बाहेरचे लोक विचार करतात. लग्न मोडण्याला एकच व्यक्ती जबाबदार असतो, हे मानणंही खूप चुकीचं आहे. सत्य हेच आहे की आमिर त्याच्या कामाप्रती पूर्ण समर्पित आहे. तो प्रत्येक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे करतो. याचाच परिणाम त्याच्या खासगी आयुष्यावरदेखील होतो. कोणतीही व्यक्ती जेव्हा इतकी खोल कामात बुडून असते, तेव्हा कधी कधी तिला स्वत:ला दुर्लक्षित केल्याचं जाणवतं.”

आमिर खानने 1986 मध्ये बालमैत्रीण रीना दत्ताशी लग्न केलं होतं. रीना आणि आमिरला दोन मुलं आहेत. जुनैद खान आणि आयरा खान अशी त्यांची नावं आहेत. लग्नाच्या सोळा वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2005 मध्ये आमिरने किरण रावशी दुसरं लग्न केलं. या दोघांनी आझाद हा मुलगा आहे. 2021 मध्ये आमिर आणि किरण विभक्त झाले. दोन्ही लग्न मोडल्यानंतरही आमिरचं प्रेम आणि लग्नसंस्थेवरील विश्वास उडाला नाही. त्याने 5 जुलै 2026 रोजी गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न केलं.

Follow Us