Nepal Flood: नेपाळच्या महापुरात प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता झाल्याची चर्चा, अखेर मुंबईत परतताच अश्रू अनावर

Nepal Flood: मानसी पारेख सुखरूप मुंबईत परतल्याने तिच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तिच्यासाठी हा प्रवास केवळ धार्मिक यात्रेचा अनुभव न राहता आयुष्यभर लक्षात राहणारा संघर्षाचा प्रसंग ठरला आहे.

Nepal Flood: नेपाळच्या महापुरात प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता झाल्याची चर्चा, अखेर मुंबईत परतताच अश्रू अनावर
अभिनेत्री मानसी पारेख
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 31, 2026 | 11:37 AM

नेपाळ-चीन सीमेवर आलेल्या भीषण फ्लॅश फ्लड आणि भूस्खलनामुळे अनेक पर्यटक आणि यात्रेकरू अडकले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अभिनेत्री मानसी पारेख देखील अडकली होती. मात्र अखेर रविवारी ती सुखरूप मुंबईत परतली. मुंबई विमानतळावर पती आणि मुलीची भेट होताच मानसीला भावना अनावर झाल्या. कुटुंबीय एकमेकांना पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या संकटानंतर अखेर आपल्या कुटुंबीयांकडे परतल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मानसी पारेख ही अध्यात्मिक गुरू सदगुरूंच्या ईशा फाउंडेशनच्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेली होती. मात्र चीनच्या नायलम, तिबेट परिसरात मोठ्या भूस्खलनामुळे तिच्यासह इतर यात्रेकरूंचा प्रवास अचानक थांबला. मानसी आणि इतर प्रवासी जवळपास चार तास बसमध्येच अडकून राहिले होते. प्रशासनाने रस्ता मोकळा केल्यानंतर त्यांना पुढे जाण्याची परवानगी मिळाली.

मानसी आणि तिच्यासोबत्या पर्यटकांचं संकट इथेच संपलं नाही. चीनमधून जवळपास 40 मैलांचा प्रवास केल्यानंतर नेपाळ सीमेवर पुन्हा मोठ्या भूस्खलनाचा सामना करावा लागला. पुढे जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने यात्रेकरूंना भूस्खलन झालेला रस्ता पायी पार करावा लागला. त्यानंतर काठमांडूपर्यंतचा बस प्रवासही अत्यंत खडतर असल्याचं मानसीने सांगितलं.

मुंबईत परतल्यानंतर मानसीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत तिची चिंता करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. “गेल्या 3-4 दिवसांचा अनुभव खूपच भावूक करणारा होता. चीनमधून बाहेर पडून नेपाळ सीमेपर्यंत पोहोचणं म्हणजे युद्ध जिंकल्यासारखं वाटलं,” असं तिने म्हटलंय. अखेर मुंबईत परतून कुटुंबाला भेटता आलं आणि मुलीला मिठी मारता आली, यामुळे संपूर्ण प्रवासाचं दुःख विसरल्याचंही तिने सांगितलं.

नेपाळच्या नॅशनल डिजास्टर रिस्क रिडक्सन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीनुसार (NDRRMA) रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत 2502 जण अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे 933 कर्मचारी, 592 परदेशी नागरिक आणि परदेशी ग्रुपसोबत प्रवास करणाऱ्या 127 नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.

Follow Us