अभिनेत्याचे वडील चालवतात रिक्षा! मराठी सक्तीवर स्पष्ट बोलले, “रिकाम्या वेळात तंबाखू खाण्याऐवजी…”
सध्या राज्यात रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची केल्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. आता या वादावर मराठमोळ्या अभिनेत्याच्या रिक्षाचालक वडिलांनी परखड मत मांडले आहे. त्यांनी "जर स्ट्राईक केला तर मराठी माणसाने 2 तास रिक्षावर बसून प्रवाशांना त्यांच्या जागेवर सोडायचं" असे म्हटले आहे.

सध्या राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘मराठी अनिवार्य’ करण्याच्या निर्णयावरून वातावरण तापले आहे. अनेकांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला तर काही अमराठी रिक्षा चालक संघटनांनी संप पुकारला आहे. आता यावर एका मराठमोळ्या अभिनेत्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. अभिनेत्याचे वडील वयाच्या 65 वर्षी देखील रिक्षा चालवत आहेत. त्यांनी मराठी सक्तीवर त्यांचे स्पष्ट मत मांडले आहे.
महाराष्ट्रात १ मे २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाने सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या निर्णयाला काही चालक संघटनांनी विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला असताना, अभिनेता अक्षय केळकरच्या वडिलांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. स्वतः रिक्षाचालक असलेल्या अक्षयच्या वडिलांनी या वादात भाषेची सक्ती करणाऱ्या निर्णयाचे समर्थन करत आंदोलकांना चांगलेच सुनावले आहे.
काय म्हणाले अभिनेत्याचे वडील?
अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे वडील स्पष्टपणे म्हणतात की, जर तुम्ही महाराष्ट्रात राहून आपला उदरनिर्वाह करत असाल, इथूनच पैसा कमवून गावी पाठवत असाल, तर इथली भाषा बोलायला तुम्हाला काहीच हरकत नसावी. त्यांनी आंदोलकांना खडा सवाल विचारला की, कमाई इथली आहे तर भाषा परकी का असावी? तुमच्या मूळ प्रांताची भाषा हिंदी असेल तर ती तुम्ही तुमच्या घरात किंवा गावी जाऊन जरूर बोला, पण महाराष्ट्रात काम करताना इथल्या भाषेत संवाद साधणे ही काळाची गरज आहे.
तसेच त्यांनी कठीण काळातील आठवण करून देताना सांगितले की, कोरोनासारख्या संकटात मराठी माणसानेच पुढाकार घेऊन परप्रांतीय मजुरांना आणि चालकांना त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी मदत केली होती. अशा परिस्थितीत आता मराठी शिकायला विरोध करणे चुकीचे आहे. भाषा शिकण्यासाठी त्यांनी एक सोपा मार्गही सुचवला आहे; रिकामा वेळ तंबाखू खाण्यात किंवा गप्पांमध्ये घालवण्यापेक्षा मराठी सहकाऱ्यांशी संवाद साधून ही भाषा सहज आत्मसात करता येते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पुकारलेल्या संपावरही तोडगा सुचवला आहे. जर परप्रांतीय चालकांनी संप केला, तर मराठी तरुणांनी एकत्र येऊन प्रवाशांना सेवा द्यावी. आजच्या काळात नोकऱ्यांची कमतरता असल्याने, जर सरकारने परवाने दिले तर अनेक मराठी तरुण रिक्षा चालवण्यास आनंदाने तयार होतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या परखड आणि जमिनीवरच्या मतामुळे सोशल मीडियावर त्यांचे मोठे कौतुक होत आहे.