Akshay Kumar: ‘ब्रिटिशांनी पण अशाच पद्धतीने आपल्यात फूट पाडली’; साऊथ-नॉर्थ फिल्म इंडस्ट्रीच्या वादावर अक्षयचं परखड मत

| Updated on: May 22, 2022 | 10:56 AM

अक्षयचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयला दाक्षिणात्य चित्रपटांविषयी (South Films) प्रश्न विचारण्यात आला.

Akshay Kumar: ब्रिटिशांनी पण अशाच पद्धतीने आपल्यात फूट पाडली; साऊथ-नॉर्थ फिल्म इंडस्ट्रीच्या वादावर अक्षयचं परखड मत
Akshay Kumar
Image Credit source: Facebook
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. RRR, केजीएफ 2 यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर घसघशीत कमाई केली. त्यामुळे त्यांच्या तुलनेच बॉलिवूड चित्रपट कमी पडत असल्याची मतं सोशल मीडियावर व्यक्त केली जात होती. या चर्चेवर काही कलाकार व्यक्तसुद्धा झाले. आता बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. अक्षयचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयला दाक्षिणात्य चित्रपटांविषयी (South Films) प्रश्न विचारण्यात आला. “फिल्म इंडस्ट्रीचं विभाजन उत्तर आणि दक्षिण असं करणंच मला पटत नाही. ब्रिटिशांनीसुद्धा (Britishers) आपल्यात फूट पाडून आपल्यावर राज्य केलं होतं. आपण त्यातून काहीच शिकलो नाही”, असं तो म्हणाला.

“मी अशा पद्धतीच्या विभाजनावर विश्वास ठेवत नाही. जेव्हा एखादा साऊथ इंडस्ट्री किंवा नॉर्थ इंडस्ट्री असं म्हणतो, तेव्हा मला खूप राग येतो. कारण आम्ही सर्वजण एकाच इंडस्ट्रीचा भाग आहोत. मला असं वाटतं की आपण असे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. ब्रिटिशांनीसुद्धा अशाच पद्धतीने आपल्यात फूट पाडली होती आणि आपल्यावर राज्य केलं होतं. त्यातून आपण कोणताच धडा शिकलो नाही का? आपण अजूनही ही गोष्ट का समजून घेत नाही? ज्यादिवशी आपल्याला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी आपण सर्वजण एकाच इंडस्ट्रीचा भाग असू”, अशी परखड प्रतिक्रिया अक्षयने दिली. ‘पॅन इंडिया फिल्म्स आणि अशा पद्धतीचे शब्द माझ्या डोक्यावरून जातात. चित्रपटांनी चांगला व्यवसाय करावा, एवढीच माझी इच्छा आहे’, असंही तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने जगभरात तब्बल 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे ‘KGF 2’ने आतापर्यंत जगभरात कमाईचा 1200 कोटींचा आकडा पार केला आहे. “हिंदी फिल्म इंडस्ट्री ही आता लार्जर दॅन लाइफ हिरोइझ्मला विसरली आहे. मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी या गोष्टीला विसरली नाही. रॉम-कॉम किंवा हलकेफुलके चित्रपट वाईट असतात असं मला म्हणायचं नाही. पण आपण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, झारखंड इथल्या प्रेक्षकांना का विसरलो? यापूर्वी आपल्याकडे वैयक्तिक निर्माते आणि फायनान्सर होते, ज्यांना फिल्म स्टुडिओच्या कॉर्पोरेटायझेशनने संपुष्टात आणलंय. कॉर्पोरेटायझेशन चांगलं आहे पण त्यामुळे चित्रपटांच्या आवडीनिवडींमध्ये अडथळा येऊ नये”, असं मत अभिनेता संजय दत्तने व्यक्त केलं होतं.