Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक, अक्षय कुमार लागला तयारीला? नेमकं सत्य काय?
Tukaram Mundhe Biopic: तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर अभिनेता अक्षय कुमार त्यांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय. नेमकं सत्य काय, ते जाणून घ्या..

सध्या राज्यात आणि सोशल मीडियावर एकाच ‘फायरब्रँड’ IAS अधिकाऱ्याची जोरदार चर्चा आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी कारवायांचा धडाकाच सुरू ठेवला आहे. भेसळयुक्त दूध, पनीर, रेस्टॉरंट, प्रतिबंधित गुटखा, नियमांचं पालन न करणाऱ्या ब्लिंकिट यांवर एफडीएकडून कारवायांचं सत्र सुरूच आहे. एक आदर्श अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंची ओळख निर्माण झाली आहे. आता त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच नव्हे तर त्यासाठी अभिनेता अक्षय कुमारची निवडही झाल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील काही पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामागचं नेमकं सत्य काय आहे, ते जाणून घेऊयात..
अक्षय कुमार विविध बायोपिक्ससाठी ओळखला जातो. आजवर त्याने ‘पॅडमॅन’, ‘मिशन रानीगंज’, ‘केसरी: चाप्टर 2’, ‘गोल्ड’, ‘एअरलिफ्ट’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आता तुकाराम मुंढे यांच्या बायोपिकमध्येही तो मुख्य भूमिका साकारणार असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुकाराम मुंढे यांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, बदल्या, कारवाया.. हे सर्व मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. मात्र या बायोपिकची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे पोस्ट आणि अक्षय कुमारचा फोटो हे नेटकऱ्यांनी एडिट करून व्हायरल केलेले आहेत. यासंदर्भात अक्षय कुमार किंवा इतर कोणत्याही निर्माते-दिग्दर्शकांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
तुकाराम मुंढे हे अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून लोकप्रिय आहेत. आजवर ज्या-ज्या क्षेत्रात त्यांची बदली झाली, त्याठिकाणी त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं कर्तव्य पार पडलं. आता अन्न आणि औषध प्रशासन विभागातही ते जबरदस्त कामगिरी करत आहेत. प्रशासकीय कामामुळे अनेकदा त्यांची बदली झाली आहे. पण तरीही त्यांनी निष्ठेने आपलं कार्य सुरू ठेवलं आहे. खऱ्या आयुष्यातील ते ‘हिरो’ आहेत, अशा शब्दांत तरुणवर्गसुद्धा त्यांचं कौतुक करतो. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा झाली तरी, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल.