Ganesh Chaturthi 2026 : बाप्पाच्या पीओपीच्या मूर्ती वाजत गाजत मंडपात आल्या, पण हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय अजून बाकी, पुढे काय घडणार?
बाप्पाच्या पीओपीच्या मूर्ती वाजत गाजत मंडपात आल्या आहेत. पण हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय अजून बाकी आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे लागलं आहे.

मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईत गणेशमंडळांची संख्या देखील मोठी आहे. मुंबईतील गणेशोत्सवाची जगाकडून दखल घेतली जाते. परंतु याच गणेश मंडळांना दरवर्षी पालिकेकडून नव्या नियमांची माहिती दिली जाते. यंदाही गणेशोत्सव मंडळांना मूर्तीची माहिती पालिकेला देणे बंधनकारक असणार आहे. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
यंदा गणेशोत्सव मंडळाना मुंबई महापालिकेला मूर्तीची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर मंडपासाठीच्या अर्जात उंचीचा उल्लेख, विसर्जन तारीख आवश्यक करण्यात आला आहे. त्यात गणेश मूर्तींबाबत न्यायालयाचा निर्णय बाकी असताना मुंबईत आगमन उत्सवाला जोर आला आहे. पीओपी गणेशमूर्तींवरील याचिकेच्या सुनावणीचा निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे. असे असले तरी मुंबईतील अनेक मंडळांनी पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) उंच गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपात आणल्या जाताहेत. त्यामुळे या मूर्तीच्या विसर्जनाबाबत न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. दुसरीकडे, मंडळाची मूर्ती पीओपीची आहे का आणि किती उंचीची आहे, याची माहिती मंडळांना मंडपासाठी अर्ज करताना पालिकेकडे द्यावी लागणार असल्याची माहिती हाती आली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर गेला महिनाभर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे या युक्तिवादावरील निर्णय न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला आहे.
रस्त्यावर खड्डा खोदल्यास दंड भरावा लागणार
मुंबईत गणेशोत्सव मंडपासाठी रस्त्यावर खड्डे केल्यास दंड भरावा लागणार आहे. पालिका प्रति खड्डा दोन हजार रुपयांचा दंड वसूल करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मंडळांनी रस्त्यावर खड्डा न खणता मंडप उभारावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं. तसेच पालिकेने खड्डेविरहित मंडप उभारणीची पद्धत जाहीर केली आहे.
मुंबईत जवळपास 12 हजारांहून अधिक गणेश मंडळ आहेत. त्याचबरोबर मुंबईत सव्वा दोन लाख घरांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबईतील बारा हजार मंडळापैकी तीन हजार मंडळांकडून मोकळ्या जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यामुळे या तीन हजारांना मंडळांना यंदाही रितसर पालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे. पालिकेने 14 ऑगस्टपासून ही परवानगी घेण्यासाठी वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर मंडप परवानगीची वैधता 26 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. मात्र मंडप उभारताना खड्डे केल्यास परिपत्रकानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केलं आहे.
