जया बच्चनशी का केलं लग्न? KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा

'जयाशी लग्न करण्यामागे फक्त प्रेमच कारण नव्हतं तर..'; 49 वर्षांनंतर बिग बींचा खुलासा

जया बच्चनशी का केलं लग्न? KBC मध्ये अमिताभ बच्चन यांनी केला खुलासा
अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नातील काही खास क्षण
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2022 | 12:14 PM

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या चौदाव्या सिझनचं सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये अनेकदा स्पर्धकांसोबत ते त्यांच्या खासगी आयुष्याविषयीचे विविध किस्से सांगतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जेव्हा बिग बींसमोर एक स्पर्धक येऊन बसली, तेव्हा त्यांना काही जुने किस्से आठवले. यावेळी त्यांनी जया बच्चन यांच्याशी लग्न करण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं.

सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘केबीसी 14’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या शोच्या नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये बिग बी हे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाच्या केसांची प्रशंसा करताना दिसतात. या स्पर्धकाने केस बांधलेले असतात, मात्र बिग बींच्या विनंतीनंतर त्या केस सोडतात आणि एक बट खांद्यापुढे घेतात.

हे पाहून अमिताभ बच्चन म्हणतात, “मी माझ्या पत्नीशी याच एका कारणासाठी लग्न केलं होतं, कारण तिचे केस खूप लांब होते.” जया आणि अमिताभ बच्चन यांची पहिली भेट 1971 मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटादरम्यान झाली. त्यानंतर या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं.

जंजीर, अभिमान, चुपके चुपके, शोले, कभी खुशी कभी गम, सिलसिला यांसारख्या चित्रपटांमध्ये ही लोकप्रिय जोडी एकत्र झळकली. पहिल्या भेटीच्या दोन वर्षांनंतर 3 जून 1973 रोजी जया आणि बिग बींनी लग्न केलं. या दोघांना अभिषेक हा मुलगा आणि श्वेता ही मुलगी आहे. श्वेता ही व्यावसायिक आणि लेखिका आहे.

एखादा चित्रपट हिट झाला तर दोघं एकत्र फिरायला जाऊ असं बिग बी आणि जया यांनी लग्नापूर्वी ठरवलं होतं. मात्र एकत्र फिरायला जायचं असेल तर आधी लग्न करावं लागेल, अशी अट अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी घातली होती. अखेर एकत्र फिरायला जाण्यासाठी जया आणि अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या ठरलेल्या तारखेआधीच लग्नगाठ बांधली होती.

Follow Us