INDIA वरून वाद सुरू असताना अमिताभ बच्चन यांचं सूचक ट्विट; चर्चांना उधाण

देशभरात सध्या भारत आणि इंडिया या नावांवरून वाद सुरू असतानाच अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. देशाचं नाव भारत ठेवावं की इंडिया यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू आहे.

INDIA वरून वाद सुरू असताना अमिताभ बच्चन यांचं सूचक ट्विट; चर्चांना उधाण
| Updated on: Sep 05, 2023 | 3:44 PM

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : देशभरात सध्या भारत आणि इंडिया वरून मोठी चर्चा सुरू आहे. भाजपविरोधातील आघाडीला विरोधकांनी ‘इंडिया’ असं नाव दिल्यापासून या चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे व्हायरल झालेल्या एका पत्रावर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख दिसल्याने या वादाला खतपाणी मिळालं. या सर्व वादादरम्यान आता बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘भारत माता की जय’ असं हे ट्विट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ‘इंडिया आणि भारत’ या नावांवरून चर्चा सुरू झाली आहे.

ट्विटरवर नेहमीच सक्रिय असणाऱ्या बिग बींनी हिंदीत लिहिलं, ‘भारत माता की जय’! त्याचसोबत त्यांनी भारताचा तिरंगा आणि लाल झेंड्याचा इमोजी पोस्ट केला. या ट्विटला अवघ्या 30 मिनिटांत 7 हजार लाइक्स मिळाले. त्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचाही वर्षाव होत आहे. बिग बी हे राजकारणापासून आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्यापासून सहसा दूरच असतात. त्यामुळे त्यांनी केलेलं ट्विट विशेष चर्चेत आलं आहे.

भारत आणि इंडियाचा वाद

9 सप्टेंबर रोजीच्या G-20 डिनरचं आमंत्रण जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झालं, तेव्हा ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावावरून चर्चा सुरू झाली. या आमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा करण्यात आला होता. त्यावर अनेक राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी भारत या शब्दाच्या वापराचं कौतुक केलं.

“इंडिया हा शब्द म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली जणू शिवीच आहे. तर भारत हा शब्द आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. मला असं वाटतं की आपल्या संविधानात बदल व्हावा आणि त्यात भारत हा शब्द जोडला जावा”, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनी दिली.

1984 मध्ये अमिताभ बच्चन यांनी अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यात ते ऐतिहासिक फरकाने विजयी ठरले होते. मात्र 1987 मध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला. तेव्हाच त्यांनी स्पष्ट केलं होतं की ते पुन्हा कधीही राजकारणात येणार नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us