9 तास उशिरा पोहोचला गोविंदा, अमरिश पुरींनी खरंच लगावली होती कानशिलात? वर्षांनंतर मुलाने सांगितलं सत्य
Amrish Puri and Govinda: शूटिंगला नऊ तास उशिरा आल्याने अभिनेते अमरिश पुरी यांनी गोविंदाच्या कानशिलात लगावल्याचा प्रसंग आजवर अनेकदा चर्चेत आला. आता अमरिश पुरी यांच्या मुलाने या प्रसंगावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे गोविंदा आणि अमरीश पुरी. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि पडद्यावर त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली. मात्र त्यांच्या नात्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून एक किस्सा चर्चेत आहे. गोविंदा शूटिंगला तब्बल नऊ तास उशिरा पोहोचल्याने अमरीश पुरी संतापले आणि त्यांनी गोविंदाच्या कानशिलात लगावली, अशी चर्चा होती. आता या जुन्या दाव्यावर अमरीश पुरी यांचा मुलगा राजीव पुरीने मौन सोडलं आहे. विकी लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये राजीव पुरीला या कथित ‘थप्पड’ प्रकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्याने हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला. त्याच्या मते, अमरीश पुरी यांचा स्वभाव असा नव्हता की ते रागाच्या भरात एखाद्याला कानाखाली मारतील.
राजीवने सांगितलं की, त्याचे वडील सहजपणे आपला संयम गमावणारे व्यक्ती नव्हते. एखादी व्यक्ती वारंवार त्रास देत असेल तरच ते नाराजी व्यक्त करायचे. त्यामुळे गोविंदाला कानाखाली मारल्याची गोष्ट खरी नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्याने स्वतःही हा किस्सा ऐकला आणि वाचला असल्याचं सांगितलं, पण आपल्या वडिलांना ओळखत असल्यामुळे त्याला या दाव्यावर विश्वास नाही.
गोविंदा आणि अमरीश पुरी यांनी 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दो कैदी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसलं होतं का, असा प्रश्न अनेक वर्षांपासून उपस्थित केला जात होता. यावर राजीव म्हणाला, गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीचा माझ्या वडिलांच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. मात्र त्यामागे कानाखाली मारल्याचा प्रसंग होता, असं मी मानत नाहीत. कदाचित गोविंदालाही जाणवलं असेल की अमरीश पुरी यांच्यासोबत काम करताना वेळेचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच त्यांनी भविष्यात त्यांच्यासोबत काम केलं नसेल, असा अंदाज राजीवने व्यक्त केला.
राजीवने यावेळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. “माझ्या वडिलांच्या मनात कोणाबद्दलही सहजपणे नकारात्मकता किंवा राग राहायचा नाही. त्यामुळे गोविंदा आणि अमरीश पुरी यांच्यात काही गैरसमज झाले असतील, तरी त्यांनी ते मनात धरून ठेवले नसावेत,” असं राजीवने स्पष्ट केलं.