माझा नवरा 96 कुळी मराठा, मी बौद्ध, घरात दोन मंदिरं… ओठात एक पोटात एकची टीका करणाऱ्याला अंशुमन विचारेच्या पत्नीचं सडेतोड उत्तर
अंशुमन विचारेच्या घरात भगवान बुद्धांची मूर्ती आणि गळ्यात मात्र हनुमान.. असं म्हणत एका युजरने ट्रोल केलं. त्यावर अंशुमनची पत्नी पल्लवी विचारेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

अभिनेता अंशुमन विचारे आणि त्याची पत्नी पल्लवी विचारे हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात. नुकताच अंशुमनच्या घरातील भगवान बुद्धांच्या मूर्तीचा संदर्भ देत एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटला पल्लवी विचारेनं सडेतोड उत्तर दिलं. तिच्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. अंशुमन विचारेच्या घरात भगवान बुद्धांची मूर्ती आहे. त्यासाठी त्याने घरात स्वतंत्र मंदिरही तयार केल्याचं पल्लवीने सांगितलं. मात्र, याच पार्श्वभूमीवर एका नेटकऱ्याने अंशुमनच्या गळ्यात असलेल्या हनुमानाच्या लॉकेटकडे लक्ष वेधत खोचक सवाल केला. “घरात भगवान बुद्धांची मूर्ती बसवली आहेस आणि गळ्यात काय हनुमान? ओठात एक आणि पोटात एक करण्याची काय गरज?” असा सवाल नेटकऱ्याने केला.
या कमेंटवर पल्लवी विचारेनं कोणताही आडपडदा न ठेवता उत्तर दिलं. “कारण तो तुझ्यासारख्या विचारसरणीचा नाही आहे. म्हणूनच त्याने बुद्धाची मूर्ती घरात बसवली आणि त्यासाठी स्पेशल वेगळं मंदिरसुद्धा केलं. कारण फक्त त्याची बायको बुद्धिष्ट आहे तो नाही, गळ्यात हनुमान आहे कारण तो हिंदू मराठा आहे. कारण तो तुझ्यासारख्या विचारसरणीचा नाही आहे. त्याच्या ओठात आणि पोटात सगळीकडेच एक अतिशय चांगला माणूस आहे, जो तुझ्यासारखा भेदभाव करत नाही,” असं म्हणत तिने संबंधित नेटकऱ्याला सुनावलं. अंशुमनने घरात बुद्धांची मूर्ती का बसवली, याचं कारणही तिने स्पष्ट केलं.
पल्लवी विचारेची पोस्ट-
‘जगा आणि जगू द्या. किती आणि का हा भेदभाव असावा? आणि खरं तर असे प्रश्नच लोकांच्या मनात का निर्माण व्हावेत, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, कारण त्यांना त्या धर्मात समता, स्वातंत्र्य आणि माणुसकी दिसली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, हीच त्यांच्या विचारांची खरी ताकद होती. माझा नवरा 96 कुळी मराठा आहे. पण जात, धर्म किंवा पंथाच्या नावावर भेदभाव करणं त्याच्या स्वभावातच नाही. उलट कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्याला अजिबात आवडत नाही. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध आणि असंख्य जाती-जमातींची माणसं त्याचे जिवलग मित्र आहेत. त्यांच्या सुख-दुःखात स्वतःच्या माणसासारखा उभा राहणारा, त्यांच्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला तो माणूस आहे,’ असं उत्तर पल्लवीने दिलं.
पहा पोस्ट-
या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे, मी बौद्ध असूनही आमच्यात कधी ह्या गोष्टीने काहीच फरक पडला नाही. माझा नवरा नेहमी बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये जातो, घोषणा देतो आणि बुद्धाच्या चरणी नतमस्तक होतो. तितक्याच श्रद्धेने जितक्या श्रद्धेने तो स्वामींच्या चरणी डोकं ठेवतो. आमच्या घरात दोन मंदिरं आहेत. एक त्याचं, एक माझं. तो माझ्या देवासमोर श्रद्धेने नतमस्तक होतो, मी त्याच्या देवासमोर आणि आमची लेक तर दोन्ही मंदिरांत तितक्याच प्रेमाने पूजा करते. कारण आमच्या घरात धर्म वेगळे असले तरी श्रद्धा एक आहे, माणुसकी एक आहे आणि प्रेम त्याहून मोठं आहे. शेवटी घर भिंतींनी बनत नाही आणि नातं जात-धर्माने ठरत नाही. माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची तयारी असेल, तर प्रत्येक धर्माच्या देवाला त्या घरात जागा मिळते. हीच खरी समता आणि कदाचित बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाचा खरा अर्थही हाच.’ धर्म आणि श्रद्धेपलीकडे माणुसकीला महत्त्व देण्याचा संदेश पल्लवी यांच्या उत्तरातून मिळत असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.