स्वत:च्याच गाण्याचा रिमेक ऐकून अनुराधा पौडवाल यांना रडू कोसळलं ! अतिशय भीतिदायक…

| Updated on: May 24, 2023 | 10:25 AM

Anuradha Paudwal On Remix : अनुराधा पौडवाल यांनी बॉलीवूडमधील रिमिक्स आणि रिमेकच्या ट्रेंडबद्दल निराशा व्यक्त करत आज अशी गाणी ऐकून रडावेसे वाटते असा खुलासा केला.

स्वत:च्याच गाण्याचा रिमेक ऐकून अनुराधा पौडवाल यांना रडू कोसळलं  ! अतिशय भीतिदायक...
Follow us on

नवी दिल्ली : 80-90 च्या दशकातील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायकांपैकी एक असलेल्या अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांना वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांचा सुरेल आवाज हीच त्यांची खरी ओळख आहे. 1973 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘अभिमान’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या गाण्याची सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत पुढे जाताना त्यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी आणि भजने गायली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले. सध्या त्या फारशा दिसत नाहीत. नुकतेच त्यांनी बॉलीवूडच्या रिमिक्स आणि रिमेकच्या (remix and remakes) ट्रेंडवर आपले मौन सोडले असून गायक अरिजित सिंगवरही निशाणा साधला आहे.

अनुराधा पौडवाल यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने आणि अवीट गोडीच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांनी गाणी आणि भजनाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यआता अनुराधा यांनी त्यांच्या जुन्या गाण्यांच्या रिमेकबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि आपल्याला हे रिमेक अजिबात आवडत नसल्याचेही सांगितले आहे. अलीकडेच त्यांनी अरिजित सिंगच्या ‘आज फिर तुम पे’ च्या रिक्रिएशनवरही त्यांचं मत मांडत ते गाणी ऐकून आपल्याला रडावसं वाटलं, असे वक्तव्य केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी या वक्तव्यावर खुलासाही केला आहे.

रिमेक केलेल्या गाण्यांबद्दल काय म्हणाल्या अनुराधा पौडवाल ?

एका मुलाखतीदरम्यान अनुराधा पौडवाल म्हणाल्या की कधी-कधी त्या त्यांची गाणी ऐकतात, पण खूप जास्त नव्हे. त्यांची भक्तिगीतं मात्र त्या आवर्जून ऐकतात, असे त्यांनी नमूद केले. पण त्या तेव्हा कधी ऐकतात माहीत आहे ? जेव्हा त्यांच्या गाण्याचं एखादं रिमिक्स ऐकल्यावर त्या घाबरतात, त्यांना रडू येतं. स्वत:च्याच गाण्यांचे रिमेक ऐकून त्या इतक्या घाबरतात, की त्यांची भजनं ऐकल्यावरच त्यांना बरं वाटतं. बॉलीवूडमधील रिमिक्स गाण्यांबद्दल विचारले असता, त्यांनी हे धक्कादायक विधान केले. अरिजित सिंगच्या ‘आज फिर तुमपे प्यार आया’ या गाण्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, ते गाणं ऐकून त्यांना रडायला यायचं. जेव्हा मी रिमेक ऐकते तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप भीतीदायक असतो, असेही अनुराधा पौडवाल यांनी नमूद केले.

90 च्या दशकात दिली होती हिट गाणी

अनुराधा पौडवाल यांनी आशिकी, दिल है की मानता नही, सडक, दिल, बेटा आणि साजन यांसारख्या चित्रपटांना आवाज देऊन गायन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अलीकडील मुलाखतीत, जेव्हा पौडवाल यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उदाहरण म्हणून अरिजित सिंगच्या रीमिक्स केलेल्या गाण्यांपैकी एकाचा दाखला देत ट्रेंडवर टीका केली. ‘दयावान’ चित्रपटातील ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ या गाण्याच्या रिमिक्सवर गायिका अनुराधा पौडवाल यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हेट स्टोरी’मधील अरिजित सिंगच्या आवाजात या गाण्याचे रिमिक्स सादर करण्यात आले आहे.

जुन्या गाण्यांच्या रिमेकवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. इंडस्ट्रीतील गाण्यांच्या रिमिक्सिंगच्या ट्रेंडबद्दल दिग्गज गायक आणि संगीतकारांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. आता या यादीत गायिका अनुराधा पौडवालच्या नावाचाही समावेश झाला आहे, ज्यांनी रिमिक्स संस्कृती नाकारली आहे. प्रत्येक वेळी रीमिक्स गाणे ऐकल्यावर कानांना आराम मिळवण्यासाठी मूळ गाणे ऐकावे लागते, असे त्यांनी नमूद केले.