Bigg Boss 18: काम्याने फिनालेच्या आधीच ‘या’ स्पर्धकाला ठरवलं विजेता; कोण आहे तो?
'बिग बॉस 7'ची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. काम्याने ग्रँड फिनालेच्या आधीच बिग बॉसच्या विजेत्याचं नाव जाहीर केलं आहे. काम्याच्या मते हा प्रसिद्ध अभिनेता बिग बॉस 18 चा विजेता ठरणार आहे.

‘बिग बॉस’चा अठरावा सिझन अखेर आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रसंचालक सलमान खान अवघ्या काही तासांत या सिझनच्या विजेत्याचं नाव जाहीर करणार आहे. यंदाच्या संपूर्ण सिझनदरम्यान सोशल मीडियावर एक अनोखं ट्रेंड पहायला मिळालं. सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत, अनेकजण त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी सोशल मीडियावर सतत सक्रिय दिसले. ‘बिग बॉस 7’ची स्पर्धक आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीसुद्धा ‘बिग बॉस 18’ संदर्भात सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. या सिझनचा विजेता कोण होऊ शकतो, हे तिने आता ग्रँड फिनाले संपण्याआधीच सांगितलं आहे.
‘बिग बॉस 18’ सुरू झाल्यापासूनच काम्याने विवियन डिसेना, करणवीर मेहरा आणि चुम दरांग यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र जसजसा हा सिझन संपण्याकडे वाटचाल करत होता, तसतसं तिने करणवीर मेहरा आणि चुम यांना उघडपणे पाठिंबा दर्शवला. आता ग्रँड फिनालेपूर्वी तिने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तिने करणवीर मेहराचं सिझनचा अंतिम विजेता, असं वर्णन केलं आहे. काम्याने तिच्या ट्विटमध्ये लिहिलं, ‘निर्मात्यांकडून दिलेला कोणताही टॅग नाही किंवा वोट बँकचा पाठिंबा नाही.. ज्याने लोकांची मनं खऱ्या अर्थाने जिंकली, तो करण बिग बॉस 18 चा अंतिम विजेता आहे.’ काम्याच्या या ट्विटवर करणवीरच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
एका लोकप्रिय पोर्टलने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार करण 37 टक्के मतांसह आघाडीवर आहे. त्यानंतर विवियनला 35 टक्के, रजत दलालला 22 टक्के मतं आहेत. अविनाश मिश्राला यात फक्त 5 टक्के मतं मिळाली आहेत. या सिझनच्या पहिल्या एपिसोडपासून करणवीर मेहरा सोशल मीडियावर त्याच्या खेळीमुळे चर्चेत होता. जिथे अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांनी मैत्रीपेक्षा खेळाला अधिक महत्त्व दिलं, तिथे करणवीर हा शिल्पा शिरोडकर आणि चुम दरांगसोबतच्या मैत्रीत प्रामाणिक राहिला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा अव्वल ठरण्यासाठी त्याने कोणाच्या पाठीत खंजीर खुपसली नाही किंवा कोणाची फसवणूक केली नाही. यामुळेच त्याला प्रेक्षकांकडून खंबीर पाठिंबा मिळत गेला. करणवीरचा प्रामाणिक आणि बेधडक स्वभाव प्रेक्षकांच्या पसंतीस उरतला.