Bigg Boss 20: तिसऱ्याच दिवशी घरात राडा, 4 स्पर्धक नॉमिनेट; बादशाहबद्दल काय म्हणाली ईशा?

Bigg Boss 20: बिग बॉस 20 चा पहिला आणि दुसरा एपिसोड प्रेक्षकांवर विशेष छाप सोडू शकला नाही. परंतु आता तिसऱ्या एपिसोडनंतर या शोमध्ये बराच ड्रामा सुरू झाला आहे. चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

Bigg Boss 20: तिसऱ्याच दिवशी घरात राडा, 4 स्पर्धक नॉमिनेट; बादशाहबद्दल काय म्हणाली ईशा?
बिग बॉस 20
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 09, 2026 | 11:13 AM

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’चा तिसरा एपिसोड पाहता आता शोचा खरा खेळ सुरू झाल्याचं जाणवतंय. ग्रँड प्रीमियरनंतर अवघ्या काही दिवसांतच घरातील स्पर्धकांमध्ये मतभेद, वाद आणि रणनीती पाहायला मिळू लागल्या आहेत. तिसऱ्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्कचा निकाल लागण्यासोबतच पहिलं नॉमिनेशनही पार पडलं. त्यामुळे घरातील वातावरण आणखी तापलं आहे. एपिसोडची सुरुवात कॅप्टन्सी टास्कच्या पुढील टप्प्याने झाली. टास्कमध्ये अनेक स्पर्धक एकामागून एक बाहेर पडले. कनिका मानने मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करत काझी तौकीरला टास्कमधून बाहेर केलं. त्यानंतर ईशा रिखी, अमन गांधी, आम्रपाली दुबे, उदिती सिंह, मेरी कॉम, रोहेद खान, कनिका मान, अरिश्फा खान आणि स्काउट यांचाही प्रवास या टास्कमध्ये थांबला. अखेरीस गुल्लू, आसिफ खान आणि यंग डीएसए हे पहिल्या कॅप्टन्सीचे दावेदार ठरले.

आम्रपाली- अरिश्फामध्ये वाद

या एपिसोडचा सर्वात चर्चेत राहिलेला भाग म्हणजे आम्रपाली दुबे आणि अरिश्फा खान यांच्यातील वाद. एका कमेंटवरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर मोठ्या शाब्दिक चकमकीत झालं. माही विजनेही या वादात हस्तक्षेप केला. शोच्या सुरुवातीपासून तुलनेने वेगळ्या पद्धतीने दिसलेल्या आम्रपालीचा संताप या एपिसोडमध्ये पाहायला मिळाला.

पहिल्याच आठवड्यात चार जण नॉमिनेट

कॅप्टन्सी टास्कनंतर घरात पहिलं नॉमिनेशन पार पडलं. या प्रक्रियेमुळे चार स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आली आहे. त्यामुळे आता घरातील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या दिवसांतच नॉमिनेशन झाल्याने प्रत्येक स्पर्धकाला आपली बाजू मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बादशाहबद्दल काय म्हणाली ईशा?

एपिसोडच्या अखेरीस ईशा रिखीच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित मुद्द्यानेही लक्ष वेधून घेतलं. रॅपर बादशाहसोबतच्या तिच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ईशाने या विषयावर स्पष्ट भाष्य करण्याचं टाळलं. याआधीच दोघांच्या विभक्त होण्याची चर्चा समोर आली होती. बिग बॉसच्या घरात प्रेमाचा ट्रॅक सुरू करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं ईशाने स्पष्ट केलं आहे.

एकंदरीत, ‘बिग बॉस 20’चा तिसरा एपिसोड वाद, टास्क, नॉमिनेशन आणि वैयक्तिक आयुष्यावरील चर्चेमुळे भरलेला दिसला. शोला सुरुवात होऊन काही दिवसच झाले असले तरी स्पर्धकांमधील समीकरणं वेगाने बदलताना दिसत आहेत. त्यामुळे पुढील एपिसोडमध्ये कोणाचं पारडं जड होतं आणि कोण घराबाहेर जाण्याच्या धोक्यात येतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us