IND vs ENG: ‘भारत-पाकिस्तानला वेगळं करण्याचं कामच..’; पराभवानंतर सेलिब्रिटींचं ट्विट

टीम इंडियाच्या पराभवानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून ट्विट्सचा वर्षाव

IND vs ENG: भारत-पाकिस्तानला वेगळं करण्याचं कामच..; पराभवानंतर सेलिब्रिटींचं ट्विट
टीम इंडियाच्या पराभवानंतर सेलिब्रिटींचं ट्विट
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 10, 2022 | 7:38 PM

मुंबई- भारतीय क्रिकेट टीमचं टी-20 वर्ल्ड कप 2022 चं स्वप्न तुटलं आहे. गुरुवारी भारत आणि इंग्लंडदरम्यान टी-20 वर्ल्डकपसाठी सेमी-फायनलचा सामना रंगला. या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर देशभरातील क्रिकेटप्रेमींकडून निराशा व्यक्त केली जात आहे. अशातच बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनीही या सामन्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘सेमी फायनलमध्ये आपण जिंकू शकलो नाही. इंग्लंडची खेळी चांगली होती आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा’, असं ट्विट अभिनेता अर्जुन रामपालने केलं. अभिनेता अजय देवगणने मोठी पोस्ट लिहित भारतीय क्रिकेटर्सची साथ दिली आहे.

‘संपूर्ण देशाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही तुमचं हृदय आणि आत्मा पणाला लावून मेहनत घेता. जरी तुमचा प्रवास फायनलच्या आधीच संपला असला तरी इथपर्यंत आम्ही तो खूप एंजॉय केला. तुमच्यावर असलेल्या दबावाची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. विजय किंवा पराजय हा खेळाचा एक भाग असतो. तुम्ही आणखी शक्तीशाली होऊन परत याल यावर माझा विश्वास आहे’, अशा शब्दांत अजयने टीम इंडियाला आधार दिला.

‘दमदार कामगिरीबद्दल इंग्लंडच्या टीमला शुभेच्छा. भारतीय टीममधील खेळाडूंच्या खांद्यावर पराभवाचं हे ओझं खूप मोठं असेल पण अशा वेळी आपल्यालाच ते ओझं हलकं करायचं असतं. टीम इंडिया, हा दिवस निराशाजनक होता. पण कहाणी इथेच संपत नाही. हा फक्त कथेचा एक भाग होता. आपण आणखी शक्तीशाली बनून पुढे येऊ’, असं ट्विट फरहान अख्तरने केलं.

केआरकेच्या ट्विटचीही सोशल मीडियावर चर्चा होतेय. ‘भारत आणि पाकिस्तानला वेगळं करणं हे ब्रिटिशर्सचं कामच आहे. पुन्हा एकदा त्यांनी हे काम खूप चांगल्या पद्धतीने केलं’, असं ट्विट कमाल आर खानने केलंय.