‘या’ दिग्दर्शकाच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख; सर्जनशील, अष्टपैलू दिग्दर्शकाला गमावले…

| Updated on: Feb 03, 2023 | 4:22 PM

के विश्वनाथ यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1965 मध्ये तेलुगू सिनेमा 'आत्मा गोवरवाहम'ने केली होती. त्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी नंदी पुरस्कार मिळाला होता.

या दिग्दर्शकाच्या निधनानंतर नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख; सर्जनशील, अष्टपैलू दिग्दर्शकाला गमावले...
Follow us on

नवी दिल्लीः तेलुगू चित्रपट क्षेत्रात आपल्या वेगळ्या दिग्दर्शनामुळे वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक के विश्वनाथ यांचे काल रात्री निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. के विश्वनाथ यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. के. विश्वनाथ या दिग्दर्शकाच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली असून, चित्रपटसृष्टीशी संबंधित लोक तसेच चित्रपट निर्मात्याच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. या दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही के विश्वनाथ यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत ट्विट केले आहे.

ज्येष्ठ चित्रपट निर्माते के विश्वनाथ यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दु:ख व्यक्त केले आहे. दिग्दर्शकाच्या निधनानंतर ट्विट करताना त्यांनी लिहिले की, ‘श्री के विश्वनाथ यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले.

ते चित्रपटसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व तसेच सर्जनशील आणि अष्टपैलू दिग्दर्शकही होते. त्यांनी वेगवेगळ्या शैलीतील आणि धाटणीतील चित्रपट बनवले होते आणि अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजनही त्यांनी केले होते. त्यांच्या कुटुंबाप्रती मी सहानुभूती व्यक्त करत असल्याचेही त्यांनी ट्विट केले आहे.

 

के विश्वनाथ यांचा 9 फेब्रुवारी 1930 जन्म झाला होता. त्यांनी केवळ दिग्दर्शक म्हणूनच नव्हे तर अभिनेता आणि पटकथा लेखक म्हणूनही चित्रपटांमध्ये काम केले होते. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली होती. त्यांच्या चित्रपटांचे देशाबरोबरच परदेशातही खूप कौतुक झाले आहे.

1980 मध्ये, ज्येष्ठ दिग्दर्शक के विश्वनाथ यांना फ्रान्सच्या बेसनकॉन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पीपल्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी रघुपती व्यंकय्या पुरस्कार आणि 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

के विश्वनाथ यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 1965 मध्ये तेलुगू सिनेमा ‘आत्मा गोवरवाहम’ने केली होती. त्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी नंदी पुरस्कार मिळाला होता. ‘ओपंडा’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. तर कन्नड चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले होते.

के विश्वनाथ यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीसह दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनिल कपूर ते चिरंजीवी यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.