Jhund: ‘साध्या माणसाची गोष्ट क्रांतीकारक कशी असू शकते?’ ‘झुंड’वर नागराज मंजुळेंचं वेगळं मत

| Updated on: Mar 07, 2022 | 2:14 PM

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'झुंड' (Jhund) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार आणि कलाकारांचं अभिनय अशा सर्वच विषयांवर सोशल मीडियावर बोललं जातंय.

Jhund: साध्या माणसाची गोष्ट क्रांतीकारक कशी असू शकते? झुंडवर नागराज मंजुळेंचं वेगळं मत
Nagraj Manjule
Image Credit source: Instagram
Follow us on

नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकार आणि कलाकारांचं अभिनय अशा सर्वच विषयांवर सोशल मीडियावर बोललं जातंय. नागपुरातील समाजसेवक विजय बारसे (Vijay Barse) यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या चित्रपटावर विविध प्रतिक्रिया येत असतानाच आता खुद्द नागराज मंजुळे त्याविषयी व्यक्त झाले आहेत. “लोकांना हा फिल्म आवडतेय, याचा आनंद आहे. फेसबुकवर लोक स्वत:हून प्रतिक्रिया देत आहेत. न्यूयॉर्क, लंडन, युएईमधून बऱ्याच मित्रांचे, भारतीय लोकांचे मेसेज येतायत की त्यांना चित्रपट आवडतोय,” असं ते म्हणाले. ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते चित्रपटाच्या कथेविषयीही व्यक्त झाले. एका सर्वसामान्य माणसाची गोष्ट क्रांतीकारी कशी असू शकते, असं त्यांनी म्हटलंय. ‘झुंड’चं कथानक आणि झुंडसारखा चित्रपट म्हणजे क्रांती असल्याचं मत अनेकांनी सोशल मीडियावर मांडलं होतं. त्यावर नागराज यांनी प्रतिक्रिया दिली.

“चित्रपटाला क्रांतीकारी म्हणणंच आश्चर्यकारक!”

नागराज म्हणाले, “आपण असं याला क्रांतीकारी म्हणतो, याचं मला आश्चर्य वाटतंय. ही साध्या माणसाची गोष्ट आहे. भारतातल्या ९० टक्के लोकांची गोष्टी आहे. ते क्रांतीकारी कसं असू शकतं, हे मला कळत नाही. खूप मोठ्या लोकांचं काहीतरी म्हणणं याच्यात आहे, त्यांचं जगणं याच्यात आहे. ते पडद्यावर येत नाही म्हणून मी प्रयत्न करतो की त्याबद्दल बोलता यावं. ज्यापद्धतीने प्रतिक्रिया येत आहेत, ते पाहून मला वाटतंय की ते यशस्वी होतंय. मला वाटतं की त्यांना अशा फिल्म्स बघायच्या आहेत. आपण समाज म्हणून, माणूस म्हणून, आजूबाजूचं पाहून पुढे पाऊल टाकलं पाहिजे, त्या दृष्टीने मला वाटतं ते महत्त्वाचं आहे,”

नागपुरात काम करण्याचा अनुभव

शूटिंग हे नागपुरात करण्यात आलं. या शूटिंगचा अनुभव सांगताना ते पुढे म्हणाले, “मला सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. नागपुरातली हिंदी आणि मराठी खूप वेगळी आहे. भाषा तर इंटरेस्टिंग आहेच, पण माणसं पण खूप इंटरेस्टिंग आहेत. नागपूर शहरात मी झुंडच्या आधीही एक-दोनदा येऊन गेलो होतो. नागपूर खूप वेगळं आहे. मला आनंद आहे, की झुंडच्या निमित्तानं, नागपूरची लोकं, नागपुरची भाषा मोठ्या पडद्यावर दिसतेय.”

हेही वाचा: 

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

‘नागराज मंजुळे भावा.. त्या ओळी मनातून जातच नाहीत’; ‘झुंड’साठी सिद्धार्थने लिहिलेली पोस्ट वाचली का?