Madhusudhan Surve: देशासाठी झेलल्या 11 गोळ्या, गमावला पाय; पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे यांच्यावर बायोपिक

| Updated on: Jun 29, 2022 | 8:20 AM

आसाममधील ऑपरेशन गेंडा, जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक, कारगिलमधील ऑपरेशन विजय, नागालँडमधील ऑपरेशन ऑर्किड आणि मणिपूरमधील ऑपरेशन हिफाजतमध्ये त्यांनी कर्तव्य बजावलं आहे. जिथे त्यांनी आणि त्यांच्या टीमने 32 हून अधिक अतिरेक्यांना यमसदनी पाठवलं. मणिपुरच्या चकमकीत सुर्वे जखमी झाले होते आणि त्यांनी पायही गमावलं होतं.

Madhusudhan Surve: देशासाठी झेलल्या 11 गोळ्या, गमावला पाय; पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे यांच्यावर बायोपिक
Madhusudhan Surve
Image Credit source: Tv9
Follow us on

लेखक-निर्माता-दिग्दर्शक नीरज पाठक (Neeraj Pathak) हे शौर्यचक्रविजेते मराठा युद्धवीर मधुसूदन सुर्वे (Madhusudhan Surve) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. नीरज पाठक दिग्दर्शित या चित्रपटाची घोषणा सुर्वे यांच्या देशभक्तीने भारलेल्या शिवतर गावी करण्यात आली. यावेळी सुर्वे यांनी नीरज यांचा शाल देऊन सन्मान केला. मधुसूदन सुर्वे हे माजी पॅराकमांडो (Paracommando) असून शत्रूच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी ते सीमेवर तैनात होते.  शत्रूच्या मागावर राहून सर्जिकल स्ट्राइकद्वारे शत्रूचा विध्वंस आणि शत्रूच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि दळणवळणाचा नाश करण्याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं होतं.

सुर्वे यांच्या रक्तात लहानपणापासूनच देशभक्तीचे वारे भिनले होते. देशभक्त असल्याने अर्धा पगार घेऊन सुर्वे सैन्यात भरती झाले होते. खेडच्या छत्रपती संभाजी राजे सैनिक शाळेतील शिवतर गावातील शहीद सुपुत्रांचा सन्मान करणाऱ्या हुतात्मा स्मारकारकडे तरुणांची पावले वळली होती. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील शिवतर गाव हे सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती भारतीय सैन्यात भरती होण्याची परंपरा आजही कायम आहे. शिवतरमधील जवळजवळ प्रत्येक कुटुंबात सैन्यात जाऊन देशाची सेवा करणारे पुरुष आहेत. युद्धनायक मधुसूदन सुर्वे यांच्या वंशजांनीही लष्करी गणवेश परिधान केला होता. पहिल्या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सैनिकांमध्ये 18 शूर सैनिक या गावातील सुपुत्र होते आणि आजही बहुतांश रहिवाशी लष्करात सेवा बजावत आहेत. गावातील हायस्कूलमध्ये महाराष्ट्रातील वीर किल्ल्यांची नावं असलेले वर्ग आहेत.

कमांडो सुर्वे यांच्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या लष्करात आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांना भारतीय सैन्यात भरती होण्याची संधी मिळाल्याचं गावकरी अभिमानाने सांगतात. केवळ लष्करच नव्हे, तर गावातील तरुण हे पोलीस दल आणि वैद्यकीय क्षेत्रातही देशसेवा करत आहेत. अशा या सैनिकांच्या गावातून आलेल्या कमांडो सुर्वे यांनी केलेली देशाची सेवा आणि कमांडो म्हणून दाखवलेले कौशल्य सगळ्यांना ठाऊक आहे. आसाममधील ऑपरेशन गेंडा, जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक, कारगिलमधील ऑपरेशन विजय, नागालँडमधील ऑपरेशन ऑर्किड आणि मणिपूरमधील ऑपरेशन हिफाजतमध्ये त्यांनी कर्तव्य बजावलं आहे. जिथे त्यांनी आणि त्यांच्या टीमने 32 हून अधिक अतिरेक्यांना यमसदनी पाठवलं. मणिपुरच्या चकमकीत सुर्वे जखमी झाले होते आणि त्यांनी पायही गमावलं होतं. सुर्वे दक्षिण आफ्रिकेतील काँगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेवरही होते. त्यांच्या कुटुंबाची पुढची पिढीही देशसेवेसाठी कार्यरत आहे. त्यांचा मुलगा एनडीएची तयारी करत असून मुलगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे.

हे सुद्धा वाचा

सुर्वे यांना 2005 मध्ये मणिपूरमध्ये नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढ्यात असामान्य शौर्य दाखवल्याबद्दल शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. या घटनेनंतर सहा वर्ष आणखी सेवा केल्यानंतर ते 2011  मध्ये निवृत्त झाले. “युद्धात फक्त विजेते असतात, उपविजेते नसतात. मधुसूदन सुर्वे यांचं शौर्य थक्क करणारं आहे, त्यामुळेच मी त्यांच्या बायोपिकचे हक्क घेतले आहेत”,  असं नीरज पाठक म्हणाले.