या देशात प्रामाणिक लोकांची थट्टाच..; IAS अधिकारीच्या राजीनाम्यावर संतापली अभिनेत्री
'गोपी बहू' या भूमिकेमुळे लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिने IAS दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्यावर पोस्ट लिहिली आहे. तब्बल 13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर दिव्या मित्तल यांनी राजीनामा दिला आहे.

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. मनोरंजन क्षेत्रातील विषयांसोबतच सामाजिक आणि देशाशी संबंधित मुद्द्यांवरही ती अनेकदा भूमिका मांडताना दिसते. आता माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर देवोलीनाने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. दिव्या मित्तल यांच्याशी संबंधित एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना देवोलीनाने व्यवस्थेवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश कॅडरच्या 2013 बॅचच्या IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी तब्बल 13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर राजीनामा दिला. त्यांनी सोशल मीडियावर या निर्णयाची माहिती दिली. आपल्या सेवाकाळाला त्यांनी अविस्मरणीय प्रवास म्हटलं असून, पद संपलं तरी समाजासाठी काही करण्याची आणि आपल्या स्वप्नांसाठी काम करण्याची भावना कायम राहील, असा संदेश दिला.
याच पोस्टवर देवोलीनाने प्रतिक्रिया दिली. “या देशात प्रामाणिक लोक आणि प्रामाणिकपणाची नेहमीच थट्टा केली जाते,” अशा आशयाची टिप्पणी तिने केली. तिच्या या वक्तव्यामुळे दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला आणखी हवा मिळाली. दिव्या मित्तल या IIT दिल्ली आणि IIM बंगळुरूच्या माजी विद्यार्थिनी आहेत. IAS होण्यापूर्वी त्यांनी लंडनमध्ये चांगल्या पगाराची नोकरी केली होती. मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याच्या इच्छेने त्यांनी परदेशातील करिअर सोडून UPSCची वाट निवडली. 13 वर्षांच्या सेवेत त्यांनी उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.
देवोलीनाची पोस्ट-
Honest people & honesty is always a joke in this country. https://t.co/h09iutrRMK
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) August 31, 2026
‘साथ निभाना साथिया’मधील गोपी बहू या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावरही सक्रिय असते. विविध मुद्द्यांवर ती अनेकदा आपली मतं मांडते. यावेळी मात्र तिच्या प्रतिक्रियेतून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व्यवस्थेत कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याबद्दलची नाराजी दिसून आली. दरम्यान, दिव्या मित्तल यांनी त्यांच्या राजीनाम्याचं कारण स्पष्टपणे सार्वजनिक केलं नसल्याचंही वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयामागे नेमकं कारण काय, याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत.